आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगतीची उत्तुंग भरारी घेतलेली असून, त्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुविधांमुळे सुसहय़ झालेले आहे. एकेकाळी रोगांच्या साथींनी लाखो लोक मृत्यूमुखी पडत होते. त्यांच्यावरती आधुनिक वैद्यकीय उपचार आणि औषधांमुळे आपण विजयश्री प्राप्त केल्याच्या भ्रमात आम्ही वावरत होतो. आपल्या भोगलालसेच्या पूर्ततेसाठी आम्ही पाळीव प्राण्यांबरोबर रानटी जनावरांचे निर्घृणपणे बळी घेत, त्यांची हत्या करणे हा आमचा हक्क असल्याचे मानत आलेलो आहोत. जिभेच्या चोचल्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कायदेकानू यांच्या बंधनांचे उल्लंघन करण्यात धन्यता मानत आलेलो आहोत आणि त्यामुळे मांसाचा पुरवठा करण्यासाठी पाळीव प्राणी उपलब्ध असताना आम्ही कायद्याने बंदी असलेल्या वन्यजीवांची शिकार करून, आमची लालसा पूर्ण करीत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही संपूर्ण जग जिंकल्याच्या आवेशात वावरत असताना, आज कोरोनासारख्या विषाणूने जगभरातल्या बहुतांश लोकांना आपल्या प्रादुर्भावाने हतबल करून टाकलेले आहे. आज जगभर 44 लाखांवरती लोक कोरोनाबाधित असून मृत्यूमुखी पडणाऱयांचा आकडा तीन लाखांच्या दिशेने जात आहे.
कोरोना विषाणूचे आलेले संकट, खरेतर जगातील समस्त राष्ट्रांनी एकजुटीने दूर करण्यासाठी प्रयत्न केले असते तर आज जी भयावह परिस्थिती आलेली आहे, त्यात सुधारणा झाली असती परंतु काही राष्ट्रे निर्माण झालेली केविलवाणी परिस्थिती म्हणजे आपणाला चांदी करण्याची संधी, अशी धारणा करून मार्गक्रमण करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. पहिल्या आणि दुसऱया महायुद्धानंतर ज्या अमेरिकेने जागतिक महासत्ता म्हणून वर्चस्व प्रस्थापित केल्यावरती वेगवेगळय़ा देशात शस्त्र सामुग्रीच्या व्यापार, उद्योगात सरशी करण्यासाठी युद्धांचा वणवा भडकवला होता, त्या अमेरिकेसमोर कोरोनाच्या संकटाने ‘दे माय, धरणी ठाय’ सारखी परिस्थिती केलेली आहे. कोरोनाचे संकट अमेरिकेवरती लादण्यात चीनचे षड्यंत्र कारणीभूत ठरलेले आहे, अशी अमेरिकन नेत्यांची धारणा झालेली आहे. त्यासाठी चीनला अद्दल घडविण्याची तयारी अमेरिकेने आरंभिलेली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी पाकिस्तान कोरोनाशी वैद्यकीय उपचार आणि औषधांद्वारे लढण्याचे सोडून लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करण्यास प्रवृत्त करीत आहे. कोरोना विषाणूच्या संकटाला आपण गांभीर्याने घेण्याऐवजी पाकिस्तान कोरोनाग्रस्तांच्या विळख्यात निष्पापांना संत्रस्त करण्याचे षड्यंत्र राबवित आहे तर दुसऱया बाजूला भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचे प्रयत्न करीत आहे. चीन पाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आरंभीच्या कालखंडात कोरोनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना केल्याने हे संकट आवाक्यात होते परंतु तिसऱया टप्प्यातल्या लॉकडाऊननंतर लादण्यात आलेले बरेच निर्बंध शिथिल करण्यात आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 78 हजारांचा टप्पा गाठण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या अडीच हजारच्या पुढे आहे. आपल्या लोकशाहीप्रधान देशात शिस्त, सौजन्याची ऐशीतैशी उडवणारी मंडळी लक्षणीय असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढलेली आहे.
आपल्याकडे आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सैनिक आणि सरकारच्या अन्य यंत्रणेमार्फत संघटितपणे आणि नियोजनबद्ध प्रयत्न लॉकडाऊनच्या प्रारंभीच्या काळात केल्याने, कोरोना विषाणूमुळे बाधित वीस हजारांवरती रुग्ण बरे करण्यात यश लाभलेले आहे. कोरोना विषाणूचे संकट आणि देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वेगवेगळय़ा राज्यात अडकून पडलेल्या मजुरांची भयानक कोंडी झाली. सध्या या मजुरांना स्वगृही पाठविण्याची पावले उचलल्याने, काही ठिकाणी त्यांचा असंतोष शमलेला आहे. दरदिवशी मोलमजुरी करून पोट भरणाऱया मजुरांची संख्या आपल्या देशात फार मोठी असल्याने त्यांची स्वगृही रवानगी करताना शासकीय यंत्रणेची काही ठिकाणी त्रेधातिरपीट उडालेली आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इतकी वर्षे उलटलेली असताना, समाजातल्या या दुर्बल घटकांच्या अस्तित्वाची जणू काही दखल घेतलेली नसल्याने, लॉकडाऊनच्या काळात त्यांना बऱयाच गैरसोयींना सामोरे जाण्याची पाळी आली आणि अजूनही त्यांची पाठवणी पूर्ण झालेली नाही.
आपला देश कृषिप्रधान असल्याने आणि मोसमी पावसावर इथली शेती अवलंबून असल्याने, लॉकडाऊनच्या प्रारंभीच्या काळात शेतकरी समाज चिंतेत होता परंतु सध्या शेती, बागायतीच्या मोसमी पाऊसपूर्व कामांना मुभा दिल्याकारणाने या परिस्थितीत संथपणे सुधारणा होत आहे. जीवनावश्यक गोष्टींबरोबर भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जे लोक जात आहेत, त्यांच्यामार्फत सामाजिक अंतर आणि चेहऱयासाठी मुखवटा वापरण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने कोरोना विषाणूचे संकट लवकरात लवकर नाहीसे होण्यास अडथळे येणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत असून महानगरांबरोबर हे संकट हरित श्रेणीत असलेल्या प्रदेशात पोहोचल्याने, परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱया बळींची संख्या 80 हजारांवरती पोहोचलेली असून कोरोनाग्रस्तांची संख्या तर 13 लाखांवरती गेलेली आहे. कोरोनाच्या संकटाने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्याने, या संकटाची व्याप्ती किती भयानक झालेली आहे, याची कल्पना येते. जर्मनी, इटलीसारख्या देशासमोरचे कोरोना संकट अजूनही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 31 हजारांवर मृत्यू उद्भवलेले असल्याने आणि कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवरती गेल्याने, तेथे 1 जूनपर्यंत टाळेबंदी लागू केलेली आहे. पैसा, प्रतिष्ठा, मालमत्ता यांच्या प्राप्तीसाठी अहोरात्र धडपडणाऱया आणि त्यामुळे नैतिकता, मानवी मूल्ये यांचे विस्मरण झालेल्या मानवी समाजाला कोरोना विषाणूने धाडकन जमिनीवरती आणलेले आहे. आपण ताकदवान अशा गुर्मीत वावरणाऱया माणसांना कोरोना विषाणूने आज गलितगात्र करून टाकलेले आहे परंतु असे असताना या संकटाला सामोरे जाताना बऱयाच देशातल्या नेत्यांची तेथील सरकारी यंत्रणेची भंबेरी उडालेली आहे. धिरोदात्तपणे आपण ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे कोरोनाच्या संकटाला सामोरे गेलो आणि लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन केले तरच त्यातून लवकरात लवकर मुक्तता होणे शक्य आहे.