ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नाकतोड्याचाच एक प्रकार असलेल्या टोळ कीटकांची झुंड पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशातील पिकांवर हल्ला करून ते उत्तरप्रदेशात आले आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तरप्रदेशच्या कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
टोळ कीटकांचा मोठा झुंड एका तासात कित्येक एकरातील संपूर्ण पीक नष्ट करतो. या कीटकांच्या झुंडीने राजस्थानातील 18 आणि मध्यप्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान केले आहे. आता हे कीटक उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचले आहेत. या टोळांच्या झुंडीने उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांना जाळ्यात ओढलेआहे. यामध्ये आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूरआणि ललितपूरचा समावेश आहे.
खबरदारी म्हणून आग्रामध्ये जिल्हा प्रशासनाने 204 ट्रॅक्टर रासायनिक फवारणीसह सज्ज ठेवले आहेत. दरवर्षीच हे कीटक पाकिस्तानमार्गे भारतात येतात.