5 जुलैपासून दर रविवारचा कर्फ्यु असणारच आहे. सरकार केवळ दहावी परीक्षा सुखरुप संपण्याची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतर मात्र जनतेच्या नशिबात आणखी काय वाढून ठेवले असेल ते कोण जाणे.
तज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरू लागला आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. आजवर रोजचा हिशेब 500 ते 600 पर्यंतचा असायचा. गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला आहे. रोज 1,000 ते 1500 च्या पट्टय़ात रुग्णांचा भरणा होऊ लागला आहे. एकूण बाधितांची संख्या 20 हजारच्या दिशेने सरकू लागली आहे. तर कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्याही वाढते आहे. या संख्येने अडीचशे आकडा पार केला आहे. मंगळवारी राज्यात एका दिवसात 20 जण दगावले आहेत, ही चिंतेची बाब आहे. राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाने कहरच केला आहे. रोज या एकाच शहरात 500 ते 800 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे पुढे काय करायचे, या विचारात सरकार आहे.
सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. 4 जुलैला ही परीक्षा संपणार आहे. तोपर्यंत सरकारला कुठलेच पाऊल उचलता येणार नाही. जर कठोर पावले उचलली तर दहावीच्या परीक्षेवर त्याचा परिणाम होणार आहे. आता केवळ 1-2 दिवसाचा प्रश्न आहे म्हणून सरकारने परिस्थिती गंभीर असूनही दमाने घेण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱयांना सूचना देऊन कोणीही याविषयी आपल्या मनाने वक्तव्ये करत राहू नका, असे म्हटले आहे. राजधानीत परिस्थिती इतकी गंभीर आहे की पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय होणार की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. मंगळवारी चोळरपाळय़ा या उपनगरातील एका 52 वषीय कोरोनाबाधिताचा राजधानीत मृत्यू झाला. सध्या हे मृत्यू प्रकरण कर्नाटकात गाजते आहे. या बरोबरच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळ्ळारी जिल्हय़ातील मृतांवर केलेले अंत्यक्रियेचा विषयही अंगावर शहारे आणणारा आहे. या दोन घटना पाहता सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना थोपविण्यासाठी काटेकोरपणे नियमांचे पालन केले पाहिजे, हे अधोरेखित होते.
चोळरपाळय़ा येथील 52 वषीय इसमाचा मृत्यू का झाला? त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्हिक्टोरिया इस्पितळात नेले होते. कोरोना असल्याचे स्पष्टही झाले होते. मात्र, त्याला दाखल करण्यासाठी इस्पितळात कॉट मिळाली नाही म्हणून त्याला घरीच ठेवून उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. सलग तीन दिवस व्हिक्टोरिया इस्पितळाच्या पायऱया झिजवूनही या कोरोनाबाधिताला प्रवेश मिळाला नाही. अखेर घरात त्याचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. एका सर्वसामान्य कोरोनाबाधिताला सरकारी इस्पितळात उपचार मिळत नाही तर गेले तीन महिने राज्य सरकारने कोणती तयारी केली आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. 52 वषीय इसमाचा मृत्यू कोरोनामुळे झाला हे खरे आहे. इस्पितळात कॉट मिळाली नाही, ही गोष्ट मात्र खरी नाही, असा खुलासा त्यांना करावा लागला आहे.
दुसरा प्रकार बळ्ळारीत घडला. उकिरडय़ात कचरा फेकावा, अशा थाटात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह खड्डय़ात फेकल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर त्याची अंत्यक्रिया कशी करावी याचे नियम ठरविण्यात आले आहेत. बळ्ळारीत जे घडले तो अत्यंत अमानुष प्रकार होता. सोमवारी एकटय़ा बळ्ळारीत बारा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी हे मृतदेह शहरापासून थोडय़ा अंतरावर असलेल्या निर्जन प्रदेशात एक मोठा खड्डा खणून या खड्डय़ात टाकले आहेत. खरे तर या भागात दोन खड्डे खणले होते. ‘आणखी एक खड्डा उद्या मरणाऱयांसाठी राहूद्यात, या एकाच खड्डय़ात आठ जणांना टाका’, असे संभाषण व्हायरल झालेल्या व्हीडिओत आहे. रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढून खड्डय़ात टाकतानाचे दृश्य मानवी मनाला हेलावणारे आहे. या प्रकाराचीही मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली आहे. ‘कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्काराची दृश्ये मनाला चटके देणारी आहेत. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला म्हणून काय झाले. त्यांच्या पार्थिवाला योग्य तो मानसन्मान दिला गेला पाहिजे. कारण मानवता ही मोठी आहे. त्यांच्याकडे मानवतेने पहा’, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱयांना केली आहे.
बळ्ळारीच्या घटनेची जोरदार चर्चा होताच स्वतः तेथील जिल्हाधिकारी एस. एस. नकुल यांनी माफी मागितली आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागावर तेथील जनतेने ठपका ठेवला होता. गायरीत कचरा टाकावा अशा थाटात मृतदेह खड्डय़ात टाकणाऱया कर्मचाऱयांवर जोरदार टीका झाली. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. ही दृश्ये पाहणाऱयांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रशासनाने सहा कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकारामुळे तेथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (विम्स) च्या गैरकारभारावरही ठळक प्रकाश पडला आहे. मृत्यू सर्वांना अटळ आहे. ज्यांच्या घरी मृत्यू झाला आहे त्यांना ही दृश्ये पाहून काय वाटेल, याचा साधा विचारही केला गेला नाही. आपल्या पराक्रमाचे व्हीडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्यातही कर्मचारीच आघाडीवर आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून एका खड्डय़ात आठ ते बारा मृतदेह पुरण्यात आले आहेत. नियमानुसार प्रत्येक मृतदेहावर स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करायचे असतात. उद्या-परवा मरणाऱयांसाठी एक खड्डा शिल्लक ठेवून एकाच खड्डय़ात मृतदेह टाकण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणावे लागेल.
जर कर्नाटकातही मुंबई आणि महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण झाली असती तर इथली व्यवस्था तोकडी पडली असती, हे स्पष्ट आहे. यातच 5 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक माणसाला जगविण्याबरोबरच गावगाडा चालविण्याच्या जबाबदारीचे भान ठेवून पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेता येणार नाही. घेतला तरी पूर्णपणे लॉकडाऊन करणे परवडणारे नाही, असे जाहीर केले आहे. 5 जुलैपासून दर रविवारचा कर्फ्यु असणारच आहे. सरकार केवळ दहावी परीक्षा सुखरुप संपण्याची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतर मात्र जनतेच्या नशिबात आणखी काय वाढून ठेवले असेल ते कोण जाणे. कारण आतापर्यंत कोरोना साथीमुळे जे घडले ते पाहून असेच म्हणावे लागेल की ‘कोरोनाने माणुसकीलाच खड्डय़ात घातले!’