गणेशोत्सव तोंडावर आला, तरी बाजारात तयार मखरांना मागणी नाहीच
अजय कांडर / कणकवली:
कोरोनामुळे सगळेच व्यावसायिक अडचणीत आले. गणपती उत्सवाला आता अवघे पंधरा दिवस राहिले, तरी टाळेबंदीमुळे गणपती उत्सवाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहताना दिसत नाही. या सर्वांचा परिणाम सार्वजनिक गणपती उत्सवाबरोबर घरगुती गणपती उत्सवावरही झाला असून गणेश सजावट साहित्याला अद्याप विशेष मागणी नाहीच. यात गणपती उत्सवात महिनाभर आधी मखरांच्या मागणीची नोंद व्यापाऱयांकडे केली जाते. पण यावर्षी गणपती उत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आला, तरी ग्राहकांनी मखर मागणीकडे अद्याप पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने तयार मखरांची आरास कोसळून या व्यवसायाला कोरोनाने घरघर लावली असल्याचे मत मखर व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात मखर व्यावसायिक महेंद्र चव्हाण म्हणतात, कोरोना, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले. यात माझ्यासारख्या लघुउद्योजकांचे खूपच नुकसान झाले. गणेशोत्सव काळात सजावटीकरिता आकर्षक मखरांची प्रचंड मागणी असते. यावरच माझ्यासारख्या कलाकाराचा उदरनिर्वाह होत असतो. गणेश चतुर्थीच्या महिने-दोन महिने अगोदरच सजावटीच्या व मखरांची ऑर्डर यायची. पण यंदा ग्राहकांचा कोणताच प्रतिसाद नाही. सरकारने ज्या सवलती लघुउद्योजकांना देऊ केल्या, त्या खूपच तुटपुंज्या आहेत. येणाऱया काळात बँकांचे कर्जाचे हप्तेही सुरू होतील. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या उद्योगाची आर्थिक घडी बसविणे खूपच कठीण जाणार आहे.
दुकान उघडून दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत
गणपती उत्सवात ग्राहक आकर्षित व्हायलाच हवा, अशी बाजारपेठेत नवनवीन मखरं बनविली जातात. थर्माकोल बंदीनंतर अनेकांनी पर्यावरणपूरक मखरे करायला सुरुवात केली. कपडय़ापासून बनविल्या गेलेल्या मखरांनाही मागणी वाढायला लागली. मात्र, कोरोनाच्या काळात कपडय़ाच्या मखरालाही अजून मागणी नसल्याचे व्यापाऱयांकडून सांगण्यात आले. एरवी या दिवसांत आम्हाला दुपारी जेवायलाही फुरसत नसते मात्र सध्या सकाळपासून दुकानाचे दार उघडून बसल्यावर दिवसभर फारसे काम नसते, अशी खंत कापड व्यापाऱयांनी व्यक्त केली. खरंतर यावर्षी काही नवीन नक्षीकाम केलेली मखरंही शिवली गेली आहेत. परंतु ग्राहकच नसल्याने तीही पडून असल्याचे सांगण्यात येते. सध्या ग्राहक अजूनही मखराबद्दल साधी चौकशीही करत नसल्याचे दिसून येत आहे. चाकरमानी गणपती उत्सवासाठी येताना मुंबईहून मखरही आणतात. मात्र, यावर्षी चाकरमान्यांनी अनेक अडचणींमुळे येण्याचे रद्द केले. काही चाकरमानी मोठे दिव्य पार करून गणेशोत्सवासाठी गावच्या घरी येत आहेत, त्यांनीही ही मखर सजावटीचे सामान फारसे आणले नसल्याचे चाकरमान्यांच्या चर्चेवरून दिसत आहे.
मखर प्रदर्शनंही लांबली
काही मखर व्यापाऱयांनी अजून मखरेही बनविली नाहीत. दरवर्षी मखरांचे प्रदर्शन गणेश चतुर्थीच्या आधी महिनाभर भरविले जायचे. अशा प्रदर्शनात पुटन, कापड, लाकडाचे तुकडे आणि त्यांच्या सहाय्याने बनविलेली मखरे आकर्षक पद्धतीने मांडली जायची. परंतु गणेश भक्तांचा निरुत्साह आणि मालाच्या उपलब्धतेचा अभाव त्यामुळे अशी मखरेही बनविण्याकडे कल कमीच असल्याचे दिसत आहे. घाऊक बाजारात चढय़ा भावानेही साहित्य विकले जात असल्याचे सांगण्यात येते. कोरोनामुळे कारागिरांची कमतरता, टाळेबंदीमुळे आधीच लोक आर्थिक संकटात आहेत. अशावेळी भाववाढ करून मखर विकणेही योग्य नाही, असेही काही विपेत्यांनी सांगितले.
मुंबईतून होणाऱया घाऊक खरेदीलाही ‘ब्रेक’ बाजारात बनावट फुलांची तयार मखरंही मिळत होती. मुंबईत दादर, लालबाग महात्मा फुले मंडई येथूनही मखरे कोकणातील चाकरमानी खरेदी करायचे आणि गावी घेऊन यायचे किंवा अशी मखरे मुंबईतून घाऊक खरेदी करून येथील स्थानिक विपेतेही घेऊन यायचे. परंतु यंदा तशीही फारशी विक्री दिसत नाही आणि ज्यांनी विक्रीला सुरुवात केली आहे, त्यांच्याकडे ग्राहकच दिसत नाहीत.