आविष्कार महिला उद्यमशील संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात डॉ. आसावरी संत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाने समस्त मानवी समुहाची जीवनशैलीच बदलली आहे. कोणत्याही भौतिक श्रीमंती व सुखापेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे. ही शिकवण कोरोनाने दिली. ही शिकवण किंवा कोरोनाने दिलेले धडे विसरता कामा नये. विशेष म्हणजे गरजा कमी करून सुद्धा सुखाने जगता येते. हा कोरोनाने दिलेला सर्वात मोठा धडा होय, असे मत डॉ. आसावरी संत यांनी व्यक्त केले.
आविष्कार महिला उद्यमशील संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात सोमवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर आविष्कारच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर होत्या.
डॉ. आसावरी संत म्हणाल्या, विषाणूंचे आक्रमण होणे, ही काही नवीन बाब नाही. चीनने हेतूतः हा विषाणू सोडला असे नाही. बिल गेट्स यांनी याचे सुतोवाच केलेच होते. मात्र या काळात जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका अपेक्षेइतकी जलद नव्हती. भारतात विमाने लवकर बंद केली नाहीत. ट्रम्प भेटीमुळे मुक्तसंचार झाला. तो काळजी करण्याजोगा होता. मात्र लॉकडाऊनमुळे बऱयाच गोष्टींवर नियंत्रण येऊ शकले. लॉकडाऊन गरजेचा आणि काटेकोरपणे राबविणे आवश्यकच होते. आज सुद्धा यु. के. मध्ये पाच जणांना एकत्र जाता येत नाही. सिंगापूरमध्ये लॉकडाऊन आहे. ऑस्टेलियाने आपल्या सीमा उघडल्या नाहीत. विषाणू पूर्ण गेला नाही. शिवाय इतका नवीन आहे, तो कसा पसरेल याचा अंदाज नाही. तरी सुद्धा आपण अत्यंत बेशिस्त राहिलो आहोत. रस्त्यावर थुंकणे पुन्हा सुरू झाले आहे. मास्क व सामाजिक अंतर याचे गांभीर्य राहिले नाही, असेही त्या म्हणाल्या.
कोविड पूर्ण गेला नसल्याने आपण समारंभ जरा जपूनच करायला हवेत. पर्यटन, शाळा मेळावे जूननंतरच केलेले बरे. मान्सूननंतर परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढील दिशा ठरवावी लागेल. लस आली आहे. कोरोना होण्यापेक्षा लस घेणे केव्हाही चांगले. त्यामुळे लसीबाबत गैरसमज बाळगू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनामुळे निद्रानाशाचे विकार वाढले, मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या, पोस्ट कोविडनंतर मधुमेह वाढतो आहे. कोविड झाल्यानंतर मधुमेह उद्भवू शकतो व ज्या मधुमेहींना कोविड झाला त्यांच्या मूत्रपिंडावर आघात होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाने सामजिक भान जागे केले व कोणत्याही बुवाबाजी, मंत्र-तंत्र याच्या आहारी न जाता, समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबला ही महत्त्वाची बाब आहे, असे डॉ. संत म्हणाल्या. यावेळी आविष्कार उद्योगिनी पुरस्कारप्राप्त धनश्री मुरकुटे तसेच उषाताई गोगटे उद्योगिनी पुरस्कार विजेत्या शिल्पा चौगुले यांनी आविष्कारने आपल्याला व्यासपीठ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुलभा खानोलकर यांनी स्वागत करून पाहुण्यांचा सत्कार केला.