तीन-चार दिवसात निर्णय -सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
अपेक्स बँक, डीसीसी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्थेतून कर्जे घेतलेल्या आणि त्यापैकी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 10,187 शेतकऱयांची 79.47 कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे. तीन-चार दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली.
लवकरच अपेक्स बँक व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करून कर्जमाफीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना संकटकाळात शेतकऱयांच्या पाठिशी राहण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱयांना आणखी अनुकूल व्हावे, यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असे ते म्हणाले.
मागील वर्षी म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षात 24 लाख 50 हजार शेतकऱयांना 15,300 कोटी रुपयांची अल्पावधी, मध्यमावधी कृषीकर्जे देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात 25 लाख 67 हजार शेतकऱयांना 17,108 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या 25.67 लाख शेतकऱयांपैकी 10,187 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांची 79.47 कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याविषयी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी विचार चालविला आहे.
मागील वर्षी शेतकऱयांना दिलेली कर्जे
बेळगाव जिल्हय़ात मागील वर्षी 3,334 शेतकऱयांनी 23 कोटी रुपयांची कृषी कर्जे घेतली आहेत. तर बागलकोट जिल्हय़ातील 672 शेतकऱयांनी 5.42 कोटी रु. कर्जे घेतली आहेत. कारवार जिल्हय़ातील 186 शेतकऱयांनी 1.70 कोटी रु., धारवाड जिल्हय़ातील 376 शेतकऱयांनी 2.07 कोटी रु. तर विजापूर जिल्हय़ातील 754 शेतकऱयांनी 5.13 कोटी रुपयांची कृषी कर्जे घेतली आहेत. यापैकी कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱयांची कर्जे माफ करण्याचा विचार सरकारने चालविला आहे.