प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचा फटका सन 2020-21 या आर्थिक वर्षातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत या वर्षात जिल्हय़ात ग्रामपंचायत यंत्रणेला दिलेले मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीष्ट केवळ 30 टक्के इतकेच झाले. त्यामुळे हे अपूर्ण उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रति ग्रामपंचायत शोषखड्डे, नॅपेड कंपोस्ट खड्डे व गांडूळ खतनिर्मितीच्या 28,764 कामांचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यासाठी 8374 प्रस्ताव आतापर्यंत दाखल होऊन त्यापैकी 110 कामे सुरू झाली आहेत.
सन 2020-21 या वर्षाकरता ग्रामपंचायत यंत्रणेला एकूण 6,77,164 मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीशट देण्यात आलेले होते. डिसेंबर 2020 अखेर 201257 अखेर इतकी मनुष्यदिन निर्मिती झाली. उर्वरित 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शिल्लक असलेल्या 60 टक्के काम करणे अपेक्षित ठेवण्यात आले. त्यामुळे मजूर निर्मितीचे उद्दीष्ट 100 टक्के साध्य करणे शक्य आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्य़ा कामावर निर्गमित केलेल्या हजेरी पत्रकाद्वारे जास्तीत जास्त 75 हजार ते 1 लाख इतकीच मनुष्यदिन निर्मिती होण्याची शक्यता आहे. व जास्तीत जास्त 50 टक्के पर्यंतच मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीष्ट डोळय़ासमोर ठेवण्यात आलेले आहे.
ग्रामपंचायत यंत्रणेला दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याकरता यापूर्वी सुरू असलेल्या कामांबरोबरच जिल्हय़ातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये किमान 30 शोषखड्डे, देन नॅपेड कंपोष्ट खड्डे, दोन गांडुळ खतनिर्मितीची कामे पूर्ण करण्याची विशेष मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे. या कामांमुळे गावातील कचरा व डासनिर्मुलन या कामांचा मोठय़ा प्रमाणात फायदा नागरिकांना होणार आहे. जेणेकरून रोगराईला प्रसार कमी करून लोकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यास व पर्यावरण संरक्षण होण्यास मोठा हातभार लागणार आहे. यासाठी ही मोहीम ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी यंत्रणेला निर्देश दिलेले आहेत.
15 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्य़ातून कामांचे प्राप्त प्रस्तावः
त्यानुसार या मोहिमेत जिल्हय़ातील एकूण 846 ग्रामपंचायतींमध्ये दिलेल्या उद्दीष्टानुसार एकूण 25,380 शोषखड्डे, नॅपेड 1692, गांडुळखतचे 1692 तर सार्वजनिक शौचालय 100 चे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत शोषखड्डय़ांसाठी 7681 प्रस्ताव, नॅपेडचे 386 प्रस्ताव, गांडुळखत निर्मितीसाठी 307 प्रस्ताव तर सार्वजनिक शौचालयासाठी गुहागरमधून केवळ 3 प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. प्राप्त प्रस्तावांपैकी जिल्ह्य़ात 70 शोषखड्डे, 26 नॅपेड तर 14 गांडुळखत निर्मितीची कामे सुरू झालेली आहेत.