ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊनवर टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता कोरोनाच्या प्रसरापासून वाचण्यासाठी ‘पूर्ण लॉकडाऊन’ हा एकच उपाय आहे असे म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी असे देखील सांगितले आहे की, भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.
दरम्यान, देशातली सध्याची परिस्थिती पाहता देशात आता संपूर्ण लॉकडाउन लागू करणे हा एकमेव पर्याय असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच केले होते. मात्र, आता त्यांनी आणखी एक ट्विट करुन आपण असे का म्हणालो याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
ते आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हणाले की, मला फक्त हे सांगायचे आहे की, भारत सरकारकडे कसलीही रणनीती नसल्याने आता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी विषाणूला रोखण्याऐवजी या टप्प्यावर पोहोचण्यास सक्रियपणे मदत केली. हा भारता विरुद्धचा एक गुन्हाच आहे, असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये सरकारला सल्ला देताना म्हटले होते की,भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.