मध्यप्रदेशातील अनेक आदिवासी गावांमध्येही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तथापि, अनेक गावांमधील आदिवासी लस टोचून घेण्यास नकार देत आहेत. त्यांनी कडूलिंबाचा रस आणि त्याच्या पानांपासून औषधे तयार केली असून ती कोरोनापासून बचाव करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणालाही कोरोना होऊ शकतो, तथापि या कडूलिंबाच्या औषधामुळे माणूस मरणार नाही एवढी शाश्वती असल्याचे ते म्हणतात. आदिवासी पट्टय़ात वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. तथापि, या आदिवासींनी हार न मानता स्वतःच्या पारंपरिक ज्ञानानुसार कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्वतःच्या औषधांवर त्यांचा अधिक विश्वास आहे.
कडूलिंबापासून तयार केलेल्या औषधांमुळे कोरोना बरा होतो किंवा नाही, याबद्दल अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत अनेक आदिवासी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. पारंपरिक औषध योजनेला दुर्लक्षित न करता किंवा टाकाऊ न समजता तिच्यावर नव्याने संशोधन व्हायला हवे. तसे झाल्यास आश्चर्यकारक उपाय हाती लागू शकतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. कडूलिंबाच्या औषधांना प्रमाणित नियमांनुसार मान्यता नाही. त्यामुळे त्यांच्या परिणामांविषयी अधिकृतरीत्या दुजोरा मिळत नाही. मात्र, प्रयोग होणे आवश्यक आहे.