प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आला आहे. कोरोनाबाबत जनजागृती याचबरोबर संशयितांच्या तपासणीसाठी आशा, अंगणवाडी, शिक्षिका, घरोघरी जात आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या महिलांच्या नावे 50 लाखांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. मात्र सरकार याबाबत गांभीर्य घेत नाही. त्या विरोधात सीआयटूने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करुन निवेदन दिले.
कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी विशेष योजना राबविणे गरजेचे आहे. मात्र सरकार कोणत्याच योजना राबविण्यास तयार नाही. आशा कार्यकर्त्यांना मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोज तसेच इतर वस्तु देणे बंधनकारक असताना त्यांना काहीच मदत करण्यात येत नाही. त्यामुळे त्यांनाच कोरोनाची लागण होवू लागली आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
आशा कार्यकर्त्यांबरोबरच पोलीस, पत्रकार, डॉक्टर, नर्स हे सर्व जण रात्रनदिवस काम करत आहेत. तेंव्हा सरकारने त्याला आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. सरकार केवळ घोषणा करत आहे. प्रत्यक्षात कार्य करणे दुरापास्त झाले आहे. हिरेबागेवाडी येथील एका अंगणवाडी शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिला कोणतीच आतापर्यंत मदत केली नाही. राज्यात आशा कार्यकर्त्या महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. तिच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप तिच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
सरकारने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सर्व निधी उपलब्ध करावा. आशा कार्यकर्त्यांना भत्ता द्यावा, यासह इतर मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी सीआटूचे जिल्हा खजिनदार जी. व्ही. कुलकर्णी, तालुका अध्यक्ष मंदा नेवगी, संध्या कुलकर्णी, मिनाक्षी दफडे, सुषमा रजपूत, कमल मेळके, शकिला कुद्दण्णावर, सुनिता ठुमरे, सुलोचना चौगुले यांच्यासह आशा कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.