ऑनलाईन टीम / पुणे :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळे लाभलेले आहे. आमच्या मनात, हृदयात शिवरायांचे अखंड स्थान आहे, असे म्हणत त्यांनी शिवरायांना वंदन केले. आता कोरोनाबरोबर आपले युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.