मृतांमध्ये तब्बल 58 दिवसांनंतर घट- दिवसभरात 1,587 मृत्यू, 62,480 नवे बाधित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता काही अंशी कमी होताना दिसत आहे. 73 दिवसांनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या आठ लाखांहून कमी झाली आहे, तर 58 दिवसांनंतर मृतांचा आकडा हा दोन हजारांपेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 62 हजार 480 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 1 हजार 587 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर दिवसभरात 88 हजार 977 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 62 हजार 793 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण बाधितांपैकी 3 लाख 83 हजार 490 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून 2 कोटी 85 लाख 80 हजार 647 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आता देशातील सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांपेक्षाही कमी झाली आहे. देशात सध्या 7 लाख 98 हजार 656 इतके रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.
आतापर्यंत देशात 26 कोटी 89 लाख नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 32 लाख 59 हजार नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.29 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण हे 96 टक्के एवढा आहे. एकंदर देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट हळूहळू का होईना ओसरताना दिसत आहे.