प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांच्या जेवणाचा प्रश्न सुटता सुटेना. ‘आम्हाला हॉटेलातील मसालेदार जेवण नको, किमान जे देता ते तरी खाण्यायोग्य द्या’ अशी रास्त मागणी करणाऱया बाधितांबरोबर बिम्स प्रशासनाचा खेळ अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला भात-आमटीत झुरळ आढळला. हे निदर्शनास आणून देणाऱया बाधितांना उशिरा जेवण पुरविण्यात आले. त्यानंतर आता अंडय़ाला मुंग्या लागल्याचा प्रकार ठळक चर्चेत आला आहे.
कोरोनाबाधितांना हॉटेलचे जेवण हवे आहे म्हणून ते रोज एक बनाव करीत आहेत. कधी झुरळ तर कधी मुंग्यांचे निमित्त सांगितले जात आहे, असा प्रतिआरोप करणाऱया बिम्स प्रशासनाने मात्र स्वतःमध्ये सुधारणा करून घेण्याची तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी प्रकरणात लक्ष पुरविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सोमवारी रात्रीच्या जेवणात अंडे देण्यात आले होते. भाताच्या कंटेनरमध्ये घालून वाटप करण्यात आलेल्या अंडय़ाला मुंग्या लागल्या होत्या. हा प्रकार तातडीने बाधितांनी बिम्स प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, कोरोनाबाधितांकडे सहानुभूतीने पाहण्यापेक्षा ते स्वतः बनाव करीत आहेत, असा आरोप करणारे बिम्स प्रशासन मात्र आपला आडमुठेपणा कायम ठेवत ‘अगा असे घडलेच नाही’ असे सांगत एकूण प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.
गेल्या चार दिवसांत कोरोना वॉर्डमध्ये घडलेला प्रकार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी जेवण वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱयाची नियुक्ती केली असून शुक्रवारपासून हा अधिकारी बिम्समधील जबाबदारी पार पाडणार आहे. अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकाऱयाची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
एक हजार खाटांच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रोज दोन वेळा जेवण व चहा दिला जातो. बाधितांच्या बाबतीत घडलेल्या प्रकारानंतर जेवणाच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. गिरीश दंडगी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता अल्पोपहार नाष्टा, दुपारी 12.30 वाजता जेवण व सायंकाळी 5.30 ते 6 या वेळेत रात्रीचे जेवण वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी दुपारचे जेवण 3.50 वाजता वाटप करण्यात आले होते. सर्व रुग्ण वॉर्डमधून बाहेर पडून खाली उतरले होते. हा प्रकार अंगलट येणार हे लक्षात येताच सावध झालेल्या बिम्स प्रशासनाने जेवणाच्या वेळा ठरविल्या तरी गुणवत्तेच्या बाबतीत मात्र अजून निकृष्टपणाच आहे, हे स्पष्ट झाले आहे. जेवण, पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा व्यवस्थित पुरवा, या रास्त मागणीकडे बिम्स प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. आता जिल्हाधिकाऱयांनी यासाठी विशेष अधिकाऱयाची नियुक्ती केल्याने शुक्रवारपासून तरी परिस्थितीत सुधारणा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.