प्रतिनिधी / कुपवाड
कोरोनाचा ईएसआय योजनेत समावेश करण्यात आला असून केंद्र सरकारने नोंदणीकृत कामगार व त्यांच्या वारसांसाठी ही योजना जाहीर केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ईएसआय नोंदणीकृत कामगारांनी व त्यांच्या वारसांनी तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय आरणके यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार घेणाऱ्या कामगारांचा खर्च ईएसआय करणार असून आजारपणाच्या काळातील दिवसाच्या पगाराच्या ७० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. या रोगामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत व पेन्शनचा लाभ तात्काळ देण्यात येणार आहे. नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीला प्रतिवर्ष केवळ १२० रुपये इतक्या अल्प दरात ईएसआयच्या दवाखान्यात मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. यासह अन्य योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने २४ मार्च २०२० पासून पुढील दोन वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कोरोना आजारातुन बरे झालेल्या कामगारांना व मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकरणे येत्या १५ दिवसात निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे ईएसआय नोंदणीकृत कामगारांनी व त्यांच्या वारसांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ नजीकच्या ईएसआय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संजय आराणके यांनी केले आहे.