मुख्यमंत्री केजरीवाल यांचा केंद्र सरकारपुढे प्रस्ताव : संसर्ग रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या पंधरा दिवसांपासून दिल्लीत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने राज्य सरकारने अधिक संसर्ग असलेल्या भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यास काही ठराविक भागात पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी तातडीने केली जाऊ शकते. लॉकडाऊनबरोबरच कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे अनेक नियमही कडक करण्यात आले आहेत.
दिल्ली सरकारने विवाह समारंभांसाठी दिलेली शिथिलता मागे घेतली आहे. यापूर्वी विवाह समारंभांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला अनुमती देण्यात आली होती. मात्र, आता फक्त 50 लोक लग्न सोहळय़ाला उपस्थित राहू शकतील. कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यावर ही संख्या 50 वरून 200 करण्यात आली होती. पण आता पुन्हा संसर्ग वाढत असल्यामुळे निर्बंध कडक करण्यात येत आहेत. दिल्ली सरकारने कोरोना संसर्गासंदर्भात केलेल्या निरीक्षण अहवालानुसार नियमांचे उल्लंघन झाल्यास आणि सामाजिक अंतराचे पालन न केल्यास दिल्लीच्या गर्दीच्या बाजारपेठा तात्पुरत्या बंद करण्याची योजना आहे. केजरीवाल सरकार यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे.
जनतेला केले सतर्क
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बोलताना केजरीवाल यांनी दिल्लीवासियांना सतर्क केले आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या पुरेशी आहे, पण आयसीयू बेड नसल्यामुळे केंद्र सरकारने मदत केली. सर्व सरकारे एकत्र काम करत आहेत, परंतु आता कोरोनाबाबत बरीच जनजागृती झाल्याने लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. बरेच लोक मास्कशिवाय फिरत आहेत. कृपया मास्क घाला आणि सामाजिक अंतराचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. सध्या महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत संसर्ग वाढत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत 1,100 हून अधिक लोकांनी दिल्लीत आपले प्राण गमावले आहेत. बुधवारी दिवसभरात 6 हजार 396 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ या शहरांमध्ये सध्या कोरोना सर्वाधिक प्रभावित आहे.