वार्ताहर / राजापूर
नियमांचे पालन करुन कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करु, अशी प्रशासनाला लेखी हमी देऊन प्रत्यक्षात सफेद कपडय़ात बांधून दिलेला मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधी करण्याचा प्रकार शहरातील कोंढेतड येथे उघड झाला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेताना संबंधितांविरोधात राजापूर नगरपरिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी फकीर जाफर हवालदार यांच्यासह अन्य सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कोंढेतड भागातील मुस्लिम समाजातील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाने लांजा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू ओढवला होता. हा मृत्यू लांजा येथे झाल्याने तेथील नगरपंचायतीने नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहावर तेथेच अंत्यसंस्कार करावेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यावेळी काही पुढारी व नातेवाईकांनी राजापुरात अंत्यसंस्कार करु, यासाठी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. शासकीय नियमांचे पालन करण्याची हमी व राजापूर नगरपरिषदेचे नाहरकत प्रमाणपत्रही देण्यात आले. प्रत्यक्षात सफेद कपडय़ात बांधून ताब्यात देण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून, काही धार्मिक विधी करून नंतर त्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेतील 2 कर्मचारी या अंत्यसंस्कारावर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित होते. मात्र विधीसाठी मृतदेह प्रार्थनास्थळात नेत आहोत, असे सांगून त्यानंतर मृतदेह वेष्टनातून बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या साऱया प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन जोरदार लढाई लढत असताना नागरिकच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये फकीर जाफर हवालदार यासह सारंग, बलबले व अन्य 4 अज्ञातांविरोधात भादंवि 269, साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 293 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘त्या’ दवाखान्याचा परवाना रद्दचा प्रस्ताव पाठवणार
घडलेल्या प्रकाराची तत्काळ दखल घेण्यात आली असून ज्या खासगी दवाखान्यातून मृतदेह ताब्यात देण्यात आला.d त्या दवाखान्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.
भाजप जिल्हाध्यक्षांचे जिल्हाधिकाऱयांना पत्र
कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कोविड नियमावलीनुसार पूर्ण पॅक करून यंत्रणेमार्फत अंतिम विधी केले जातात. परंतु कोंढेतड येथे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्र लिहिले आहे. राजापूर तालुक्यातील संबंधित शासकीय यंत्रणा, अधिकाऱयांना हा विषय निदर्शनास आणून देण्यात आला, मात्र याकडे पुरेशा गांभिर्याने पाहिलेले नाही. कोविड नियमावली सरळसरळ धुडकावून सर्व नागरिकांच्या जीविताला संसर्गाचा धोका निर्माण करून गुह्याचे कृत्य संगनमताने केले गेले. त्यामुळे याबाबत कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी ऍड. पटवर्धन यांनी निवेदनातून केली आहे.