मृतांचा आकडा लपविण्यात येत असल्याचा आरोप : केवळ सरकारी रुग्णालयांतील कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीची घोषणा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिकडे-तिकडे ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांचा आकडा लपविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. केवळ सरकारी रुग्णालयांतील कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीची घोषणा करण्यात येत आहे. खासगी रुग्णालये आणि घरी मृत झालेल्यांची माहिती घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा किती? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने नागरिकांचे जगणे मुश्कील बनले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढली असून मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिकडे-तिकडे ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होऊ लागले आहेत. वास्तविक पाहता ही परिस्थिती उद्भवण्यास जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. सध्या परिस्थिती खुपच गंभीर बनली असून मागील वषीच्या तुलनेत यंदा ऑक्सिजन मिळाले नसल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत उपलब्ध झाले नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सरकारी रुग्णालयात बेड मिळणे कठीण बनले असून खासगी रुग्णालयातही बेड जलदगतीने फुल्ल होत आहेत. पण सध्या प्रत्येक रुग्णाचा ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याचे निदर्शनास येत असून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. पण कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असून कोरोना बाधितांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.
आक्सिजनअभावी मृत्यू पावणाऱयांची संख्येत वाढ
विशेषतः आक्सिजनअभावी मृत्यू पावणाऱयांची संख्या वाढली आहे. जिल्हा रुग्णालयाकडून दररोज कोरोनाबाधित, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येचा लेखाजोखा प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा जाहीर करण्यात येत आहे. पण हा आकडा केवळ जिल्हा रुग्णालयात मृत पावणाऱयांचा आहे. जिल्हा रुग्णालयामधून सदाशिवनगर स्मशानभूमीत दररोज दहाहून अधिक मृतदेह अंत्यविधीसाठी येत आहेत. पण रुग्णालयाकडून जाहीर करण्यात येणारी मृतांची आकडेवारी व अंत्यविधीकरिता येणाऱया मृतदेहांचा आकडा पाहता त्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा लपविण्यात येत आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसह नातेवाईकांची परवड
सध्या शहरात अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अक्षरशः रुग्णांची व नातेवाईकांची परवड होत आहे. कोरोनाबाधितांना ऍडमिट करण्यासाठी पॅकेज सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निव्वळ लूट होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तरीही रुग्णालये फुल्ल झाली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर घरी उपचार करण्यात येत आहेत. पण खासगी रुग्णालये आणि घरी उपचार घेताना वेळेत ऑक्सिजन मिळाले नसल्याने मृत पावणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.
शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये अंत्यविधी करण्यात येत असून याबाबत अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध नाही.
सध्या जिल्हय़ातील तसेच शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा अंत्यविधी शहरातील स्मशानभूमीत करण्यात येत आहे.
घरी उपचार सुरू असताना मृत झाल्यास थेट स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील मृतांची आकडेवारी सांगणे आता अशक्मय आहे.
तोंडावरचे मास्क खाली आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ
मागील वर्षी आणि यंदा निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेता, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शहरवासीय बेफाम झाल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील वषी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर राज्य शासन, जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या होत्या. लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. पण मध्यंतरीच्या कालावधीत शासनाने सर्व व्यावसायिकांना मुभा दिल्यानंतर नागरिकांच्या तोंडावरचे मास्क खाली उतरले. सामाजिक अंतर राखणे, कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र, आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पसरली असून देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. मृतांची आकडेवारी वाढत असल्याचेही निदर्शनास आले आहे.