सदोष सामग्रीमुळे जलद चाचण्या थांबविण्याचा आदेश, मृतांची संख्या 600 पार, बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मंगळवारी संध्याकाळपर्यंत देशभरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 18 हजार 200 वर पोहचली आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये बाधितांच्या संख्येत 1348 ची भर पडली. 1 हजार हून अधिक भर पडण्याचा हा सलग तिसरा दिवस होता. मुंबई आणि पुणे येथील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. तर मध्यप्रदेशात इंदूरमधील रूग्णांचा आकडा आता 1000 च्या जवळ पोहचला असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत असून मंगळवारी एकच दिवसात 705 रूग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली. हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याचे दिसून आले आहे. तसेच रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही आणखी वाढून तो 8.2 दिवस झाला आहे. ही सकारात्मक घडामोड मानली जात आहे.
‘जमातीं’चा उद्दामपणा सुरूच
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे मोहम्मद शाहीद नामक प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. तबलीगी जमातीच्या 30 लोकांना त्याने लपविले होते. यातील 16 विदेशी नागरीक होते. ते व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही या प्राध्यापकाच्या साहाय्याने अलाहाबाद येथे रहात होते. शाहीद याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून त्याने लपविलेल्या 30 जणांना विलगीकरणात ठेवल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.
जलद चाचण्यांवर बंदी
कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना जलद चाचण्या करण्याचा आदेश दिला होता. तथापि, चीनकडून घेण्यात आलेली चाचणी सामग्री निकृष्ट निघाल्याने चाचण्यांचे अहवाल चुकीचे आले आहेत. त्यामुळे या सामग्रीचा उपयोग करून चाचण्या केल्या जाऊ नयेत असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. परिणामी जलद चाचण्यांवर दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. आता सिंगापूरहून नवी सामग्री मागविण्यात आली आहे.
पालघर हत्याकांडाचे पडसाद
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंसह तिघांना पाच दिवसांपूर्वी ठेचून मारण्यात आले होते. पोलीसांसमक्ष हे निर्घृण हत्याकांड घडले होते. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. राजस्थानच्या काँगेस सरकारने या हत्याकांडाची निंदा केली असून दोषींना कठोर शिक्षा द्यावी असे आवाहन पेले आहे. मृत झालेल्या एका साधूच्या पत्नीनेही हत्याकांड करणाऱयांना फासावर लटकवावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारने या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी विलंब लावल्याची टीकाही होत आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणातूनही या हत्याकांडाचा जोरदार निषेध करण्यात आला आहे.