वडाळय़ातून आल्या रत्नागिरीत, रविवारी दोघींचाही अहवाल पॉझीटीव्ह टेम्पो चालकाचा शोध सुरू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रविवारी पॉझीटीव्ह अहवाल आलेल्या रत्नागिरीतील चौघांमधील दोन महिला आंब्याच्या टेम्पोतून रत्नागिरीत आल्याचे स्पष्ट झाले आहे. टेम्पोवाल्याने महिलांना माळनाका येथे सोडल्यानंतर या महिला स्वतःहून जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या दोघींचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर आता टेम्पोवाल्याचा शोध सुरू आहे. याआधी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वायंगणी येथे आंबा वाहतूक करणाऱयाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुंबईत आंबा वाहतुक करणाऱया चालकांची प्रत्येक फेरीनंतर तपासणी करण्याची मागणी होत आहे.
मागील आठवडय़ापासून जिह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आता पर्यंत जिल्हय़ा एकूण 42 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यातील काही अपवाद वगळता सर्वजण मुंबईकर चाकरमानी अथवा मुंबई पावासाचा इतिहास असलेले आहेत.
रविवारी पॉझीटीव्ह अहवाल आलेल्या या दोन महिला मुंबईतील वडाळा येथून आल्या होत्या. या दोन महिलांनी 7 मे रोजी वडाळा ते चेंबूर असा टॅक्सीने प्रवास केला. चेंबूर येथे त्या आंब्याच्या ट्रक मध्ये बसल्या. 8 मे रोजी सकाळच्या सुमारास त्या रत्नागिरीत माळनाका येथे दाखल झाल्या. त्यानंतर स्वतःहून त्या जिल्हा रुग्णालयात गेल्या. त्यांना तत्काळ आयटीआय येथे क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. रविवारी या दोघांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला.
या दोन महिलांना रत्नागिरीत एका आंबेवाल्याने आणल्याचे समोर आले आहे. त्या चालकाचे नाव या महिलांना माहित नसल्याने यंत्रणांसमोर पेच निर्माण झाला आहे. आंबे वाहतूक करणाऱया ट्रकमध्ये दोन पॉझीटीव्ह रूग्ण सापडल्याने त्या चालकाची तपासणी करणेही गरजेचे असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईत आंबा वाहतूक करणाऱया वाहनांच्या चालकांच्या तपासणीचा मुद्दाही जोर धरत आहे. यापुर्वी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे आंबा वाहतूक करणाऱया चालक कोरोनाबाधीत झाला होता.