नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच ‘कोरोनामुक्तां’च्या आकडय़ाने देश आणि जागतिक पातळीवर मोठी ‘गूड न्यूज’ दिली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोरोनामुक्तांनी 95 हजार 880 पर्यंत झेप घेतली. त्या तुलनेत नवे पॉझिटिव्ह रुग्ण 93 हजार 337 इतकेच सापडल्याने डिस्चार्ज आणि पॉझिटिव्ह यांच्यात प्रथमच जवळपास अडीच हजारचा फरक दिसून आला. एकीकडे देशातील आकडेवारीने दिलासा दिला असतानाच जागतिक पातळीवरही भारताने मोठी मजल गाठली आहे. कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या रुग्णांच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, जगातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत देशातील 42 लाखाहून अधिक लोक कोरोनाहून बरे झाले आहेत आणि आपल्या घरी निघून गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोरोनामधून बरे होणाऱया रुग्णांच्या बाबतीत भारताने अमेरिकेचा पराभव केला आहे. आतापर्यंत भारतातील एकूण 42 लाखांहून अधिक लोक कोरोनाहून बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठी सरकारने वेळेत घेतलेल्या कारवाईचा परिणाम ही जागतिक स्तरावरील उपलब्धी आहे. चाचण्यांना दिलेली गती, वेगवान देखरेख आणि ट्रकिंगद्वारे प्रमाणित उच्च-गुणवत्तेच्या क्लिनिकल काळजीद्वारे आणि प्रभावी उपाययोजनांचा फायदा भारताला फायदा झाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
24 तासात 95 हजार 880 रुग्ण झाले बरे
कोरोना विषाणू साथीच्या आजाराने भारताला पूर्णपणे विळखा घातला आहे. भारत या साथीच्या विरोधात तीव्र लढा देत आहे. देशात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे, परंतु दरम्यानच्या काळात भारतात कोरोनामधून बरे होणाऱया रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढली आहे. देशात शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात तब्बल 95 हजार 880 जणांना डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 42 लाख 8 हजार 431 इतके रुग्ण कोरोना आजारातून सुखरुपपणे बाहेर पडले आहेत. तसेच गेल्या 24 तासात देशात एकूण 93 हजार 337 रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत मृतांचा आकडा 1,247 इतका झाला आहे. आतापर्यंत देशात 53 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. अजूनही 10 लाख 13 हजार 964 इतके सक्रिय रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.
रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर
लोकांच्या रिकव्हरीच्या बाबतीतही भारताने आता सर्व विक्रम तोडले आहेत. आतापर्यंत देशात 42 लाख 8 हजार 431 रुग्ण निरोगी झाले आहेत. संसर्गमुक्त रुग्णांचा हा आकडा जगातील सर्व देशांमध्ये सर्वाधिक आहे. देशात संसर्गापासून बरे होण्याचे प्रमाण सुमारे 80 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूचे प्रमाण घटून 1.611 टक्क्मयांवर आले आहे. निरोगी रुग्णांच्या नवीन रुग्णांपैकी जवळपास 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यातील आहेत. या पाच राज्यात सर्वाधिक प्रमाणात संसर्गही झाले आहेत.