रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांनी आतापर्यंत चांगल्यापैकी संयम दाखवला आणि कोरोना मुक्तीचा मार्ग अवलंबला. दोन्ही जिह्यातील जनतेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
कोरोनामुळे भारतातच नव्हे तर सर्व जगातील लोकांवर परिणाम झाला आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी रोगातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. कोरोनावर संयम आणि प्रशासनाला सहकार्य हाच मोठा आधार ठरला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांनी आतापर्यंत चांगल्यापैकी संयम दाखवला आणि कोरोना मुक्तीचा मार्ग अवलंबला. दोन्ही जिह्यातील जनतेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. प्रशासनाचे लोक काहीसे दिलासादायक परिस्थितीत गेले असले तरी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून सर्वांचे काम सुरू आहे.
रत्नागिरी जिह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 6 आढळली. त्यापैकी एकजण मृत्यूमुखी पडला बाकी पाच रुग्णालयातून बरे होऊन घरी पोहोचले. बचावलेल्या सर्वांच्या अंतिम चाचण्याही नकारात्मक आल्या. वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांचे कुटुंबीय तर आनंदीत झालेच पण जिह्यातील जनतेने सुटकेचा निश्वास टाकला. या 6 रुग्णांपैकी रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावचे 3 आणि विशेष म्हणजे ते सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या कुटुंबात 15 जण एकत्र राहत होते. त्यांचे खाणे-पिणे व अन्य व्यवहार नेहमीच्या पद्धतीने सुरू होते. असे असताना त्यातील एका महिलेला न्यूमोनियाची लागण झाल्याचा संशय आला म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी झालेल्या चाचणीमध्ये ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वी मुंबईला जाऊन आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले पण बहुधा त्याच्या मुंबई प्रवास इतिहासामुळे महिलेला कोरोना झाल्याचे पुढे आले. या रुग्ण महिलेच्या जावेला विकाराची बाधा झाली. पण अन्य जवळच्या नातेवाईकांना बाधा झाली नाही. जावेच्या जवळच्या नातेवाईकांना बाधा झाली नाही. तथापि, कुटुंबातील सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली. हे बाळ आईचे दूध पीत होते. आईच्या दुधामुळे कोरोनातून बाहेर येण्यासाठी मदत झाली असे बाळावर उपचार करणाऱया तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
एका बाजूला अपरिचित व्यक्तीपासून किमान 3 फूट दूर रहा असे सरकारी पातळीवरून उच्चरवाने सांगितले जात आहे. याबाबतीत नियमितपणे आईचे दूध पिणाऱया रुग्ण बाळापासून आईला अजिबात बाधा झाली नाही. शेवटपर्यंत आईचे तपासणी अहवाल नकारात्मक येत राहिले. कोरोनाचा प्रसार ही वैद्यक विश्वाची डोकेदुखी झाली आहे. असे असताना रत्नागिरीतील विशिष्ट कुटुंबात दिसून आलेली प्रतिकार शक्ती हा वैद्यक विश्वाने नोंद घ्यावी असाच प्रकार आहे.
एकाच कुटुंबातील 15 जणांचे व्यवहार, खाणे-पिणे, कपडेलत्ते एकत्र असताना त्यातील केवळ तिघांना लागण झाली. निकट संपर्क असतानाही 12 जण रोगविरहित राहिले. ज्या कारणामुळे प्रतिकारशक्ती वाढली त्या कारणांचा शोध कदाचित वैद्यक व्यवस्था घेईल. एड्ससारख्या दुर्धर रोगामध्ये आता प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उपायांवर भर दिला जात आहे. कोणत्याही दुर्धर रोगाला अडवायचे असेल तर नैसर्गिक प्रतिकारशक्तीची मदत घेतली तर बाह्य उपचारांपेक्षा ते निश्चितच उपयोगी ठरत आले आहेत. सिंधुदुर्गात केवळ एकच रुग्ण आढळला. कोरोनावर कोणतेही औषध नसताना लक्षाणाधारित उपाययोजना करण्यात आली. त्यातून रुग्ण बरा झाला. त्यानंतर सिंधुदुर्गातील जनतेनेही समाधान व्यक्त केले. दोन्ही जिह्यातील लोक संयम मानणारे आणि आरोग्य जोखिमांची जाणीव ठेवणारे असे आहेत. याबाबतीत लोकांनी चांगल्या संयमाचा परिचय दिला आणि किमान आतातरी रोगमुक्ती साधली.
रोगमुक्तीनंतर सामान्य स्वरूपाचे जीवन अद्याप लोकांना मिळू शकले नाही. राज्य व केंद्र सरकार जेव्हा टाळेबंदीचे धोरण बदलतील तेव्हा लोकांच्या जीवनात फरक पडेल. माणसांची सुरक्षितता सर्वोच्च आहे. माणसाच्या सुरक्षिततेसाठीच देशभर टाळेबंदी लागू झाली आहे. रोगमुक्तीनंतर लोकांना चरितार्थाचा मुद्दा गंभीरपणे हाती घ्यायचा आहे. मानवी व्यवहारांना टाळेबंदी लागू करण्यात आली असली तरी निसर्गचक्राला मात्र टाळेबंदी नाही.
शेतकऱयांना निसर्गचक्राप्रमाणे वावरावेच लागत आहे. काही शेतकरी पावसाळापूर्व मशागत म्हणून शेतात भाजावळ करतात. ही भाजावळ योग्य आहे की नाही हा चर्चेचा विषय आहे. आवश्यक असणारे बियाणे ऊन लावून ठेवले जाते. काही ठिकाणी धुरळावाफेची भात पेरणी होत असते. हीदेखील बऱयाचवेळी उन्हाळय़ातच पूर्ण होत असते. आंब्याची तोड करण्याचे काम हातघाईवर आलेले असते. फणस, रतांबा, काजू अशी पिकेही याचवेळी येत असतात. या सगळ्याला तोंड देताना शेतकरी कुटुंबे अनेकवेळा अपुरी पडतात. शेवटी जेवढे शक्य आहे तेवढे पूर्ण करावे असा निर्णय घेतला जातो. कोरोनाची दहशत असली आणि संचारबंदी असली तरी शेतकरी वर्ग आपापल्या पारंपरिक कामामध्ये व्यस्त आहे.
रतांबा, फणस, करवंद, जांभूळ, आंब्यासारखी फळे बाजारात आणण्याठी सध्याच्या टाळेबंदीमुळे मोठीच अडचण निर्माण झाली आहे. फळ प्रक्रिया करणाऱया कारखान्यांना मुभा देण्यात आली असली तरी त्यांचे काम नेहमीप्रमाणे सुरू होईल अशी शक्यता नाही. फळे खरेदी करून ती कारखान्यात आणण्यापर्यंत सर्व सुविधा सध्या उपलब्ध नाहीत. टाळेबंदीच्या निमित्ताने लागू झालेले अडसर फळप्रक्रियेच्या कारखान्यांकरिता मोठे अडचणीचे ठरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील मजुरांना घरी जाऊ द्या असे धोरण स्वीकारले आहे. दुसऱया बाजूला राजस्थानसारख्या राज्यात कोटा येथे शिकण्यासाठी गेलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पावले पडत आहेत. कोकणी चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीचे आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच एक विधान केले की, चाकरमान्यांना गावी आणण्याचा निर्णय झाल्यास आपण त्यांचे स्वागत करू. या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा मोठा विरोध आहे. लाखापेक्षा अधिक संख्येने कोकणात येणाऱया लोकांचे आरोग्य व्यवस्थापन केले जाईल असे मंत्री म्हणत आहेत. प्रत्यक्षात ते कितपत शक्य होईल हा प्रश्न आहे. काही भाग चाकरमानी आणि स्थानिक रहिवासी यांच्या नशिबावर अघोषितपणे सोडून दिला जाईल अशी चिन्हे आहेत.