कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
जिल्ह्यात सात महिन्यांनंतर कोल्ह्यापूरचे कोरोनामुक्तीकडे पाऊल पडले आहे. गुरूवारी कोरोनामुक्तांची टक्केवारी 97 वर पोहोचली अन् कोरोनामुक्तीत कोल्ह्यापूर जिल्हा राज्यात टॉपवर पोहोचला. केअर सेंटरवर मोफत रेमिडीसिव्हीएरचा वापर, तातडीने उभारलेली ओटू सेंटर आदीमुळे हे शक्य झाले आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कम्युनिटी स्प्रेड असतानाही ऑक्टोबरअखेरीस राज्यात कोरोनामुक्तीत कोल्ह्यापूर टॉपवर आले आहे. तरीही नागरिकांनी मास्क, सॅनिटायझेशनचा वापर डिसेंबरपर्यत सुरूच ठेवावा, असे आवाहन प्रशासनासह वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यात 3 मेपुर्वी कोरोनाचे 123 रूग्ण होते. जूनमध्ये ही संख्या पाचशेवर पोहोचली, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 5 हजार, 17 हजार आणि 21 हजार नवे रूग्ण समोर आले. कम्युनिटी स्प्रेड व दुषित वातावरणामुळे कोरोनाची साथ वाढत गेली. त्यामुळे प्रारंभी कोरोनामुक्तीत आघाडीवर असलेले कोल्हापूर पुन्हा राज्यात मागे पडले. दरम्यान, प्रशासनाने तातडीने केअर सेंटर उभारली, औषधे, इंजेक्शन्स पुरवली, गणेशोत्सवासह अन्य सण, उत्सवांतील गर्दी टाळण्यात जनतेचेही सहकार्य लाभले. या सामुहिक प्रयत्नांतून ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहातच जिल्हाने कोरोनामुक्तीकडे पहिले पाऊल
जिल्ह्यात सुरूवातीला प्रतिदिन कोरोना रूग्णांची संख्या 1100 ते 1200 पर्यत होती, त्यावेळी कोरोनामुक्तांचा दर 50 टक्क्यांखाली होता. जनजाग़ृती, कठोर उपाययोजनांमुळे त्यात हळूहळू प्रगती होत गेली. पॉझिटिव्ह रूग्णसंख्येने 40 हजारांचा टप्पा ओलांडला, ऑक्टोबरअखेर पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजारांवर असली तरी कोरोनामुक्तांची संख्याही 45 हजारांवर गेली आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 25 रूग्ण उपचार घेत आहेत. नव्या रूग्णांची संख्या सरासरी 50 ते 75 च्या दरम्यान आहे. कोरोनामुक्तांची संख्या सरासरी 65 ते 75 वर आहे. रूग्णसंख्या घटली आहे, तपासण्या कमी झाल्या आहेत. तसेच 60 टक्के केअर सेंटर रिकामी आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये तर 300 बेड रिकामे झाले आहेत, या सकारात्मक बाबी कोरोनामुक्तीचे दर्शन घडवत आहेत.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनातून बरे होणाऱयांची संख्या 97 टक्क्यांवर पोहोचली, ही टक्केवारी राज्यात टॉप ठरली आहे. कोल्ह्यापूर कोरोनामुक्तीत टॉपवर आहे. शेजारील सातारा, सांगली जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असताना कोल्ह्यापुरात कोरोनामुक्तीचे सकारात्मक वातावरण आहे. पण धोका टळलेला नाही, कोरोनाचा विषाणू अद्यापी वातावरणात आहे. त्यामुळे निदान संपुर्ण कोरोनामुक्तीसाठी प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझेशन वर्षअखेरपर्यत सुरूच ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी केले आहे.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोरोना उपचार केंद्रे सुरू आहेत, तेथे संशयितांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे कोरोनानंतरचे उपचार सुरूच राहणार आहेत. फक्त कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने जनतेतील भीती कमी होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर 97 टक्क्यांवर,
केअर सेंटरमध्ये मोफत रेमिडीसीव्हीएरचा फायदा,
संपुर्ण कोरोनामुक्तीसाठी डिसेंबरपर्यत काळजी घ्या
मास्क, सॅनिटायझेशनकडे दुर्लक्ष नको ः आवाहन