अचूक बातमी “तरुण भारत”ची, गुरूवार 7 एप्रिल 2022 सकाळी 11.45
● जिल्ह्यातील अनेक गावे सज्ज
● 24 तासात 213 संशयितांच्या चाचण्या
● सातारला 2 तर खंडाळा 1 रूग्ण
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाने काढता पाय घेतल्याने हजारो गावात दोन महिन्यांपासून एकही रूग्ण नाही. मार्च सुरू झाल्यानंतर तीनपेक्षा जास्त रूग्णवाढ झालेली नाही. त्यामुळे दोन वर्षे रखडलेल्या यात्रांचा उत्साह जिल्ह्यात वाढला आहे. काही गावात यात्रांचा हंगाम मोठ्या दणक्यात पार पडला आहे तर काही गावे यात्रेसाठी सज्ज झाली आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 213 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून अवघे 3 रूग्ण वाढले आहेत.
यात्रांचा हंगाम, मनोरंजनाचा उत्साह
दोन वर्ष जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होते. त्यामुळे प्रत्येक सणांसह यात्रा जत्रा कोरोना निर्बंधाच्या चौकटीत अडकल्या होत्या. मात्र आता कोरोनाचे निर्बंध हटल्याने जिल्हाभरातील गावा गावात यात्रांचा हंगाम उत्साहात सुरू झाला आहे. यात्रांच्या हंगामामुळे कोरोनात आर्थिक पिचलेल्या लोककलावंत, आर्केस्ट्रा, कुस्त्यांची मैदाने, बैलगाडा शर्यती यासह मनोरंजनात्मक कार्यक्रमांना बहर आला आहे. त्यांचीही आर्थिक कोंडी आता सुटेल असे चित्र सध्या आहे.
9 तालुके शुन्यावर
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 3 रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी सातारा तालुक्यात 3 तर खंडाळा तालुक्यात 1 रूग्ण वाढला आहे. बाकी नऊ तालुक्यात एकही नवा रूग्ण वाढलेला नाही. ग्रामिण भागातही आता कोरोनाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्रांची संख्याही नगण्य झाली आहे.
गुरूवारी
नमुने-213
बाधित-3
गुरूवारपर्यंत
नमुने-25,73,290
बाधित-2,79,208
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,818