प्रतिनिधी/ सातारा :
सातारा जिल्हय़ात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने वातावरणात चिंताजनक बनू लागले होते. तर बाधितांच्या सहवासात आलेल्या असंख्यजणांची काळजी वाढत होती. मात्र बाधितांच्या सहवासात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे ही जमेची बाजू असून आता जिल्हय़ात कोरोनामुक्त होत असलेले रुग्ण गंभीर परिस्थितीत वातावरण दिलासादायक करत आहेत. लॉकडाऊनचा अर्थ सातारकरांसह गावी आलेल्या मुंबईकरांनाही कळला असून सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असल्याने लवकरच जिल्हा या संकटातून मुक्त व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा असली तरी यापुढील काळात सतर्क रहावेच लागणार आहे.
सातारा जिल्हय़ात आरंभीच्या काळात कोणीही कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने दिलासा मिळत होता. मात्र त्यामुळे जिल्हय़ात लॉकडाऊनची गंभीरता पाळली जात नव्हती. पोलीस दलाला संचारबंदीत कठोर होवून काही निर्णय घ्यावे लागले ते जनतेच्या हितासाठीच होते. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रथमपासून जिल्हय़ातील नागरिकांसह मुंबई, पुणेकरांना घरातच बसण्याचे आवाहन केले होते. होमक्वारंटाईन केलेल्यांनी कालावधी पूर्ण झाल्याशिवाय घराबाहेरच पडू नये असे आवाहन ते वांरवार करत होते त्यांची कळकळ आता नागरिकांना कळू लागल्याने जिल्हाभरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सकाळी व सायंकाळी काही वेळ सवलत देण्यात आली आहे. मात्र खरं तर नागरिकांनी गरज असेल तर बाहेर पडले पाहिजे अन्यथा बाहेर पडण्याची गरजच नाही असे समोर उभे ठाकलेले संकट सांगत आहे. एकाच दिवशी चार कोरोनाबाधित समोर आल्यानंतर जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर गेल्यानंतर नागरिक गंभीर झाले आहेत. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे, मास्क वापरणे, घरीच थांबणे या गोष्ठी नागरिक करत असल्याने भविष्यातील लढाईला त्याचे बळ निश्चितपणे मिळणार आहे.