प्रतिनिधी / रत्नागिरी
दहीहंडीचा उत्सव उद्यावर येऊन ठेपला तरी कोरोनामुळे तो नसल्याचा भास साऱयांना होत आहे. उत्सवाच्या 2 महिनेआधी थरांच्या सरावाला सुरूवात होते. ‘बोल बजरंग बली की जय’ अशा आरोळ्या देत थर रचले जातात. दहिहंडीच्या दिवशी आयोजकांनी लावलेली मोठ-मोठी बक्षिस जिंकण्यासाठी गोविंदा पथकांची धडपड असते. परंतु, यंदा गोविंदा पथकांवर आणि दहिहंडी उत्सवावर कोरोनाचं सावट परसले आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाचे थर पहायला मिळणार नसल्याचे चित्र जिल्हय़ात आहे.
दरवर्षी त्यासाठी जिल्हाभरातील दहीकाला उत्सव मंडळे या उत्सवाच्या नियोजनात गुंतून जातात. गतवर्षी जिल्हय़ात 351 सार्वजनिक व 3 हजार 239 खासगी स्वरूपात दहिहंडय़ा फुटल्या होत्या. पण यंदा दहिहंडी फोडण्यासाठी रचले जाणारे थरांचे मनोरे लागणार नाहीत. यंदा गोविंदा पथकांवर आणि दहिहंडी उत्सवावर कोरोनाचं सावट आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ाभरात कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता दहीहंडी उत्सवाचा माहोलही शमला आहे.
दहीहंडीची तयारी म्हणून मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला काही दिवस अगोदर सुरूवात करत असतात. गोपाळकाल्याच्या दिवशी गल्लीबोळातील गोविंदा पथकं वाजतगाजत, दहीहंडय़ा फोडत मुंबई, ठाण्यात फिरत असतात. पण उद्या 12 ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. पण कोरोनामुळे आलेल्या बंधनामुळे हा उत्सव देखील सोशल डिस्टन्सिंगमध्ये अडकला आहे. दहीहंडी उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणारे आणि तो बघणारे अशी प्रचंड गर्दी होते. आता गर्दी होणे योग्य नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा होण्यावरच मर्यादा पडली आहे. पथकांनी स्थानिक पातळीवर सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करत जन्माष्टमीची पूजा करावी, असे आवाहन केले गेले आहे.
दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱया विविध साहित्यांनी आणि रंगीबेरंगी, नक्षीदार दहीहंडी मडकी बाजारात दाखल होतात. यावर्षीही देखील बाजारात दहिहंडीची मडकी विक्रीसाठी आली आहेत. पण हा उत्सव साजरा करण्यावरच बंधने आल्याने मडकी विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली आहे.