बौद्ध पौर्णिमेनिमित्त संबोधन- संकट काळात बुद्धांनी दाखविलेला मार्ग अनुसरणे गरजेचे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बुद्ध पौर्णिमनिमित्त वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनला व्हर्च्युअली संबोधित केले आहे. यादरम्यान त्यांनी कोरोना महामारीबद्दल स्वतःचे विचार मांडले आहेत. महामारीमध्ये स्वकीयांना गमाविलेल्या लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. कोरोनाने पूर्ण जगालाच बदलून ठेवले आहे. या अवघड काळात बुद्धांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. कोरोनाविरोधी युद्धात आम्हाला बौद्ध संस्थांकडून सहकार्य मिळत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
कोरोनामुळे पूर्ण जग संकटात आहे. महामारीने जगाला बदलून ठेवले आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाच्या दुसऱया लाटेला तोंड दिले आहे. या लढाईला एकत्रित लढूनच जिंकता येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महामारीशी लढण्यासाठी आता आमच्याकडे अनेक उपाययोजना आहेत. लस उपलब्ध झाल्याने ही लढाई अधिकच मजबूत झाली आहे. या संकट काळात आमचे आरोग्य आणि प्रंटलाईन कर्मचारी स्वतःचा जीव जोखमीत टाकून लोकांचा जीव वाचवत आहेत. डॉक्टर आणि नर्सेसचे योगदान कुणीच विसरू शकत नसल्याचे पंतप्रधान म्हणाले.
वैज्ञानिकांबद्दल गर्व
महामारीच्या काळात लाखो लोकांनी स्वकीयांना गमाविले आहे. त्यांचे दुःख आम्ही जाणू शकतो. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो. आम्हाला आमच्या वैज्ञानिकांवर गर्व आहे, त्यांनी एक वर्षापेक्षा कमी काळात लस तयार केल्याने आम्ही लोकांचा जीव वाचवू शकल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
आयबीसीच्या मदतीने कार्यक्रम
हा कार्यक्रम संस्कृती मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघाच्या (आयबीसी) सहकार्याने आयोजित करण्यात आला. या व्हर्च्युअल कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघांचे प्रमुख सामील झाले. श्रीलंका आणि नेपाळच्या पंतप्रधानांसह जगभरातील 50 हून अधिक बौद्ध धर्मगुरुही यात सहभागी झाले.
श्रीलंकेत वेसाक पर्व
बुद्ध पौर्णिमा हा बौद्धधर्मीयांसाठी मोठा दिन आहे. या धर्माला मानणारे बहुतांश लोक चीन, जपान, कोरिया, थायलंड, कंबेडिया, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि भारतात राहतात. या दिवशी ते बोधि वृक्षाची पूजा करतात. श्रीलंकेत हा दिवस वेसाक नावाने साजरा करण्यात येतो.