तामिळनाडू सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ चेन्नई
कोरोना संकटादरम्यान डॉक्टर आणि अन्य प्रंटलाइन कर्मचाऱयांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकारही स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत. कोरोना प्रभावित भागांमध्ये जाणे, बाधितांशी संवाद, त्यांच्या कुटुंबीयांची व्यथा जाणून घेणे आता पत्रकारांचे नित्याचेच काम ठरले आहे. कोरोना संक्रमणामुळे अनेक पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत तामिळनाडू सरकारने पत्रकारांची दखल घेतली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच पत्रकारांना प्रंटलाइन कर्मचाऱयांच्या श्रेणीत सामील केले होते. सरकारने आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मिळणारी भरपाईची रक्कम वाढविली आहे. राज्य सरकारने पत्रकारांना मिळणारा स्पेशल इंसेंटिव्ह वाढवून 3 हजारांवरून 5 हजार रुपये केला आहे. याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱया पत्रकारांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एका संस्थेनुसार एप्रिल 2020 आणि 16 मे 2021 पर्यंत कोरोना संक्रमणामुळे देशात एकूण 238 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.