वसंत व्याख्यानमालेत अनिरुद्ध ठुसे यांचे व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
अचानक उद्भवणारे खर्च आपल्या नियंत्रणात नसतात. कोरोना असाच उद्भावला व आपल्या आणि देशाच्या अर्थचक्राची घडी विस्कटली. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून पुढील एक वर्षाचे तरी नियोजन करायला हवे व ज्यांचे उत्पन्न थांबले त्यांनी वैधमार्ग पैसा कसा येईल, याचे नियोजन करावे, असे मत अनिरुद्ध ठुसे यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेत ‘अर्थ’ ‘कारण-काल आज व उद्या’ या विषयावर ते बोलत होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने हे व्याख्यान झाले. ते म्हणाले, प्राप्ती किंवा उत्पन्न खर्च कारण, बचत (प्रवृत्ती) गुंतवणूक शिल्लक हे अर्थकारणाचे घटकचक्र आहे. खर्च करण्याची प्रवृत्ती असेल तर बचत करण्याचे प्रमाण कमी होणे स्वाभाविक आहे. बचत म्हणजे गुंतवणूक नव्हे, सर्व बचत कधीच गुंतवली जात नाही. ती वेगळी करावी लागते व यातून शिल्लक किती हे पहाणे महत्त्वाचे आहे.
अर्थकारण हे प्रामुख्याने आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते. गुंतवणूक करण्याचा निर्णय योग्य असावा लागतो. परंतु अर्थकारण व गुंतवणूक कालानुरुप बदलून जाते. बचत व शिल्लक वेगळी, शिल्लक म्हणजे खेळता पैसा, अर्थकारणाचे घटकचक्र देशपातळीपासून कुटुंबापर्यंत खर्च घटकांना लागू होतात, असे ते म्हणाले.
‘काल’चे अर्थकारण असा विचार करता 1991 ते आजपर्यंत असा कालावधी आहे. या काळात आर्थिक धोरण बदलले. खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण वाढत्या उत्पन्नामुळे उंचावलेले राहणीमान, मुक्त बाजारपेठ, गुंतवणुकीचे नवे स्रोत, बँकांचे विलीनीकरण व खासगी विमा कंपन्यांची वाढ हे बदल घडले.
या पार्श्वभूमिवर ‘उद्या’ चे अर्थकारण हे दीर्घकालीन गुंतवणुकीचा अभाव, त्वरित पैसा मिळविण्याकडे कल, लहान व्यवसाय करण्यास प्राधान्य व स्वदेशी लोकप्रियता वाढेल असे सांगून ठुसे यांनी समारोप केला.
अध्यक्षा मीना खानोलकर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. नूतन सभासद श्रीया देशपांडे, स्नेहा सांगलीकर, अंजली नाडगौडा यांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीया देशपांडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.