ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाने दुसऱ्या लाटेत अक्षरशः हाहाकार माजविला आहे. दैनंदिन रुग्ण संख्या आणि मृत्यू संख्या देखील झपाट्याने वाढत वाढत आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केेले आहे.
ते म्हणाले, राज्यात बेडस् उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे म्हटले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात हाहाकार उडाला आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजन रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे.
- देशात लॉकडाऊन ?
दरम्यान, देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन वा अन्य कोणते निर्बंध लागू करायचे याचा निर्णय घेऊ शकतात. तुर्तास तरी देशात घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.