उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना परिस्थितीमुळे परिवहन महामंडळाच्या चार परिवहन निगमना 4,000 कोटी रुपयांहून अधिक फटका बसला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधानसभेत दिली. सुमारे 2,980 कोटी रुपये उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे, असे ते म्हणाले.
शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तर चर्चेवेळी निजदचे सदस्य के. टी. श्रीकंठेगौडा यांच्या प्रश्नावर सवदी यांनी उत्तर दिले. परिवहन महामंडळाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात खात्याला अधिक अनुदान देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. अनुदान मिळाल्यानंतर नुकसान भरून काढण्यास मदत होईल, असे मंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले.
राज्यातील विविध भागातील आमदारांनी नव्या बस खरेदी, नवे बसस्थानक निर्माण यासह विविध मागण्या आपल्याकडे केल्या आहेत. मात्र, या मागण्या कोरोना परिस्थितीमुळे पूर्ण करणे शक्य झालेले नाही. अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर मागण्या पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.