थंड, आंबट, तळलेले पदार्थ वर्ज्य
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काळजी घेण्याशिवाय पर्याय नसल्याने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स या नियमांसोबत आहारातही बदल करण्यात आला आहे. संतुलित आहार घेण्यावर भर दिला जात आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे थंड पदार्थ खाण्याकडे नेहमी कल वाढलेला असतो. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा आरोग्याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. आहारातून थंड, आंबट, आणि तळलेले पदार्थ टाळलेले जात आहेत. यामुळे सर्दी, खोकला होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच बाहेरील खाद्य पदार्थ बनवताना काळजी घेतली जात असली तरी प्रत्यक्ष हे पदार्थ खाणे किती सुरक्षित असा प्रश्न खवैय्यांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर संतुलित आहार घेण्यावर भर दिला जात आहे. संतुलित आहार आपण घेतल्यामुळे आजारपण येत नाही. मानसिक स्वास्थ चांगले राहते. सकाळच्या वेळी नाष्टयाला एक ग्लास दुध, ताक, शिरा, पोहे, पोळी टोस्ट, बेड अंडे व फळे यांचे सेवन करण्यात येत आहे.
दुपारच्या जेवणात एक मध्यम आकाराची वाटी घट्ट डाळ, उसळ व मांसाहारी मध्ये मासळी किंवा चिकन अंडय़ाचा पदार्थ सोबत चपाती, भात, भाकरी, ताक, दही, व कोशिंबीर यांचे सेवन करण्यात येत आहे. तर संध्याकाळी भाकरी, पोळी, भात फळभाजी, कोबी, गाजर, दुधी भोपळा व बटाटा, कढी, सुप यांचे सेवन केले जात आहे. यामुळे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन व लोह, मिनरल्स मिळते.