अर्थसहाय्याअभावी आत्मनिर्भर कसे बनणार?
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीत भर पडली आहे. अशा स्थितीत आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केंद्र शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र विविध खात्याच्या वतीने व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया योजना केंद्र व राज्य शासनाने तुर्त बंद ठेवल्या आहेत. केवळ फेरीवाल्यांसाठी योजना राबविण्यात येत आहेत. निधी नसताना गरजू, गरीब, बेरोजगार, शेतकरी आणि व्यापारी आत्मनिर्भर कसे होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोना विषाणुचा प्रसार झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह बडय़ा व्यवसायिकांना देखील या महामारीचा फटका बसला आहे. देशभरात लाखो नागरिक बेरोजगार झाले आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विविध व्यवसायांवर देखील परिणाम झाला आहे. गेल्या 7 महिन्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक नागरिकाची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाकडून गरजू व गरीबांच्या खात्यावर 3 महिने अनुदान जमा करण्यात आले. तसेच फेरीवाल्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सहाय्य धन देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मात्र सर्वसामान्य आणि गरजुंसाठी विविध खात्यांच्या वतीने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने राबविण्यात येणाऱया योजना निधी अभावी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
नोकरी नाही, व्यवसाय नाही, कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा स्थितीत शासनाच्या योजना देखील बंद आहेत. त्यामुळे निधी नसताना आत्मनिर्भर कसे होणार असा मुद्दा निर्माण झाला आहे. मागीलवषीच्या पावसाळय़ात अनेक लोकांची घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे सरकारी योजनेतून अनुदान देण्यात आले. पण ते अनुदान देखील अपुरे आहे. घराची उभारणी करणाऱया नागरिकांना शासनाकडून पुरेसे अनुदान देण्यात आले नसल्याने घराचे बांधकाम रखडले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाकडून घरकुल योजनेंतर्गत सहाय्यधन देण्यात येते. राजीवगांधी आवास योजना, झोपडपट्टी निर्मूलन, वाजपेयी आवास योजना, आंबेडकर आवास योजना, तसेच स्वयंरोजगार योजनेंतर्गत सहाय्यधन दिले जाते. महापालिकेच्या माध्यमातून मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि गरीबांसाठी राखीव निधी अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहे. तसेच शेतकरी, व्यवसायिक आणि बेरोजगारांसाठी विविध खात्यांमार्फत योजना राबविण्यात येतात. ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, तालुका पंचायतच्या माध्यमातून योजना राबविण्यात येतात. मात्र योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगून सर्व योजना स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून कोणत्याच योजनेकरीता निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे. आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केंद्र शासनाकडून करण्यात येत आहे. पण खासगी संस्थांकडून अर्थसहाय्य देण्यास टाळाटाळ होत आहे. अशातच शासकीय योजना देखील बंद आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर कसे होणार असा मुद्दा उपस्थित होत आहे.