केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यावर देशभरात मागील 3 महिन्यांमध्ये 577 मुले अनाथ झाली आहेत. या मुलांच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरपले असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. 1 एप्रिलपासूनची ही आकडेवारी असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आली आहे.
कोरोनामुळे आई आणि वडील दोघांनाही गमावलेल्या प्रत्येक असहाय्य मुलाला पाठिंबा तसेच संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे इराणी यांनी सांगितले आहे. या मुलांना वाऱयावर सोडले जात नसून जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित सुरक्षा दिली जात असून लक्ष ठेवण्यात येत आहे. या मुलांना समुपदेशनाची गरज भासल्यास नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स त्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले.
या मुलांची देखभाल करण्यासाठी निधीची कमतरता नाही. मुलांसंबंधी केंद्र सरकार सातत्याने राज्य आणि जिल्हय़ांसोबत संपर्कात आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाची सर्व संबंधित घटकांशी बैठक झाली असून यात युनिसेफचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या.