समडोळीत स्वाभिमानी कोरोना केंद्राचे उद्घाटन
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. वेळेवर उपचार सुरू केले की कोरोना बरा होतो. कोरोनाला दुर्लक्षित करू नका. काळजी घ्या, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मिरज तालुक्यातील समडोळी येथे जिल्ह्यातील व पश्चिम भागातील सामान्य जनतेच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या पहिले ५० बेडच्या स्वाभिमानी कोव्हीड २०१९ या कोरोना केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, आपणास थोडी जरी लक्षणे दिसत असतील तर तपासून वेळेत उपचार घ्या. कोरोना बरा होतो. पॉझिटिव्ह रुग्ण व संशयित रुग्ण असे दोन कक्ष करा. ज्यांचा स्कोअर जास्त आहे व उपचारासाठी पुढे पाठविण्याची गरज आहे त्यांना दवाखान्यात बेड उपलब्ध झालेनंतर दाखल करा. तसेच कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिसाद द्या. घरामध्ये राहूनच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वागत स्वाभिमानीचे सदस्य दिपक मगदूम तर प्रास्ताविक स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी केले. संयोजन न्यू रणझुंझार युवक मंडळ यांनी केले.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई आडमुठे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, माजी सभापती वैभव पाटील, सरपंच विलास अडसूळ, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.