- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘ब्रेक द चेंज’ ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत पुढील 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर 144 कलम लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले, भूकंप, मुसळधार पाऊस आणि पूर आल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केले जाते. तसेच या आपत्तीने बाधित लोकांना आर्थिक मदत दिली जाते. यासह आपण सर्वांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून कोरोना महामारी असा या रोगाचा स्वीकार केला आहे. म्हणूनच, पंतप्रधानांना मी विनंती करतो की, ज्या लोकांच्या जीवनावर या नैसर्गिक आपत्तीचा, महामारीचा परिणाम झाला आहे त्यांना आर्थिक सहाय्य करावे. दरम्यान, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पंतप्रधानांना पत्र लिहिले.
दरम्यान, सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजार दिला आहे. कोरोना संकट एक आपत्ती आहे. पण या संकटाला अजून आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे याचा फटका बसलेल्यांना व्यक्तिगत मदत करता येणार नाही, असे ते म्हणाले. तसेच कोरोना संकटाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यासाठी केंद्राने पुढे यायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.