नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीयांना आनंद व्हावा, असे वृत्त कोरोनाच्या या महासंकटात समोर येत आहे. ‘आयुर्वेद’ या प्राचीन भारतीय उपचारपद्धतीत ज्या वनस्पतीचे महत्व सांगण्यात आले आहे, त्या अश्वगंधा वनस्पतीचा कोरोना विषाणूच्या विरोधात प्रभावी रितीने उपयोग करता येतो, असे दिल्ली आयआयटी आणि जपानची आयएएसटी या संस्थांनी संयुक्तरित्या केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
अश्वगंधा आणि प्रोपोलिस या वनस्पतींची नैसर्गिक संयुगे कोरोना रोखण्यासाठी प्रभावी ठरली आहेत. या दोन संस्थांच्या संशोधकांनी अश्वगंधा वनस्पतीपासून बनविलेल्या संयुगांचा प्रयोग ‘सार्स कोव्हिड-2’ या विषाणूदव्यावर केला. या विषाणूद्रव्याला कोरोनामूलद्रव्य (एमपीआरओ) म्हणून ओळखले जाते. हा प्रयोग समाधानकारकरित्या यशस्वी झाला आहे. याच विषाणूद्रव्यापासून सध्याचा कोरोना, अर्थात कोव्हिड-19 हा विषाणू उत्क्रांत झाला आहे. त्यामुळे अश्वगंधा सध्याच्या कोरोनाविरोधातही चांगली कामगिरी करू शकेल असा विश्वास संशोधक डी. सुंदर यांनी व्यक्त केला. अर्थात हे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे.
या महत्वाच्या संशोधनामुळे कोरोनाविरोधातील औषधे शोधण्याची गती वाढणार आहे. कोरोनाचे विषाणू नष्ट करण्यात अश्वगंधा वनस्पती भविष्यात महत्वाची भूमिका घेऊ शकेल एवढा आत्मविश्वास या संशोधनातून निर्माण झाला आहे.
सहज उपलब्धता
अश्वगंधा वनस्पती भारतात कोठेही सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. या वनस्पतीपासून निर्माण केलेल्या संयुगांची सायक्लोडेक्स्ट्रिन्स संयुगांशी युती केल्यास प्रभावी औषध निर्माण होऊ शकते. हे औषध कोरोना होऊच नये यासाठी आणि झालास बरा करण्यासाठी अशा दोन्ही दृष्टींनी उपयोगात आणले जाऊ शकेल असा संशोधकांचा कयास आहे. अश्वगंधा वनस्पतीवर आयुष मंत्रालयाकडूनही अभ्यास सुरू आहे. हे औषध उपलब्ध होण्यास काहीसा वेळ लागू शकतो. पण आशेचा एक किरण दिसू लागला आहे, हे निश्चित, असे संशोधकांचे म्हणणे आहे.