भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक एन. के. गांगुली यांचा विश्वास
प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱया भयकारी अशा कोविड-19 विषाणूवर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी पर्यंत ही लस उपलब्ध होईल, असा अंदाज आयसीएमआरचे म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक एन. के. गांगुली यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत आयसीएमआरने दिलेल्या माध्यम वृतात डॉ. गांगुली यांनी म्हटले आहे की, बहुतेक लस विकास कार्यक्रमांचे उद्दिष्ट परिणामकारक, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी कृत्रिम लस बनविण्यासाठी किटाणूवरील स्पाईक प्रोटीन्सचे आनुवंशिक कोड ओळखणे (जेनेटिक कोड) महत्त्वाचे आहे. कोरोनाबाबतीत ते आधीच ओळखले गेले आहे. त्यामुळे ही कृत्रिम लस निर्माण करणे सोपे होणार आहे.
लस निर्माण करणाऱया ‘भारत बायोटेक’ने फिलाडेल्फीया येथील ‘जेफर्सन विद्यापीठाशी’ भागीदारी केली आहे. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून फेब्रुवारी अखेरपर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लस निश्चितच विकसित केली जाईल, असे डॉ. गांगुली म्हणतात.
कोरोनावर लस विकसित करण्यासाठी पुण्यात ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरालॉजी’मध्ये जमा करण्यात आलेल्या ‘व्हायरस स्ट्रेन’चा वापर करण्यात येणार आहे. हे ‘व्हायरस स्ट्रेन’ यशस्वीरित्या भारत ‘बायोटेक इंटरनॅशनल’कडे पाठविण्यात येणार आहे.
भारताची स्मार्ट चाचणी निती योग्य
सामान्यतः लस विकासासाठी प्रयोग शाळेपासून बाजारपेठेपर्यंत सरासरी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. नॅशनल सेंट्रल फॉर बायोटेक्नॉलॉच्या माहितीनुसार एमआरएनए लसीची क्षमता अधिक आहे. त्याचे उत्पादन कमी खर्चात आणि सुरक्षितपणे होवू शकते. दक्षिण कोरिया आणि चीनपेक्षा भारताची लोकसंख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर भारत स्मार्ट चाचणी करत आहे, अशी माहिती देऊन डॉ. गांगुली म्हणाले, अधिकारी क्लस्टर आणि हॉटस्पॉटमध्ये विषाणूची तपासणी करीत आहेत. देशातील 1.3 अब्ज लोकसंख्येच्या तुलनेत दिवसाला 1 लाख चाचण्या कमी आहेत. आठवडय़ाला किमान एक दशलक्ष चाचण्या होणे आवश्यक आहे. परंतु आपण सर्व पैसा त्यावरच खर्च करू शकत नाही. म्हणूनच भारताची स्मार्ट चाचणी निती योग्य आहे.
शिवाय दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या पायाभूत सुविधाही भारताकडे नाहीत. हॉटस्पॉट आणि क्लस्टरमध्ये विषाणूचे प्रसारण सर्वाधिक आहे. त्यामुळे या क्षेत्राला स्मार्ट चाचणीद्वारे लक्ष केले जात आहे, असेही गांगुली यांचे म्हणणे आहे.