प्रतिनिधी/ पणजी
कोरोना रुग्णांवर उपचार करणारी 21 खाजगी इस्पितळे सरकारने ताब्यात घेतली असून उद्या सोमवारपासून राज्यातील कोणत्याही इस्पितळात रुग्णांना कोरोना उपचारांसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
कोरोना उपचार करणाऱया खासगी इस्पितळात रुग्णांची होणारी लुटमार आणि भरीस डीडीएसएसव्हाय कार्ड स्वीकारण्यास देण्यात येणारा नकार, अशा तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील आदेश आज जारी होणार असून उद्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. त्यानंतर सर्वांना मोफत उपचार मिळणे सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या इस्पितळातील 50 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येतील. या इस्पितळांना डीडीएसएसव्हाय अंतर्गत 100 टक्के उपचार खर्च देण्यात येणार येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
20 हजार लीटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीची पाहणी
बांबोळीत गोमेकॉ परिसरात बसविण्यात आलेल्या सुमारे 20 हजार लीटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीची पाहणी केल्यानंतर शनिवारी सायंकाळी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य सचिव रवी धवन, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि आरोग्य संचालक डॉ. ज्योस डिसा यांची उपस्थिती होती.
प्रत्येक इस्पितळात सरकारी अधिकारी
ताब्यात घेतलेल्या अशा प्रत्येक इस्पितळात सरकारी अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून रुग्णांना दाखल करून घेण्याची जबाबदारी हे अधिकारी पार पाडणार आहेत. मात्र कामाचे नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी पूर्णपणे संबंधित इस्पितळाचीच असेल. त्याचबरोबर आतापर्यंत डीडीएसएसव्हाय कार्डधारकांसाठी 80 टक्के खर्च इस्पितळांना देण्यात येत होता. उद्यापासून तो 100 टक्के देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारी इस्पितळांवरील ताण होणार कमी
या व्यवस्थेमुळे यापुढे सरकारी इस्पितळांवरील ताण कमी होऊन कोणत्याही रुग्णावर खाट न मिळाल्याने जमिनीवर झोपण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धाडसी निर्णयाचे आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी स्वागत केले असून या निर्णयाची गोव्यातील जनतेला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना धन्यवादही दिले आहेत.
गोमेकॉत सुरू करण्यात आलेल्या क्रायोजनिक टाकीसंबंधी बोलताना अशाप्रकारची ही तिसरी टाकी असल्याचे ते म्हणाले. 6000 लीटर क्षमतेची पहिली टाकी दक्षिण जिल्हा इस्पितळात बसविण्यात आली आहे. तेथे सुमार 500 रुग्ण उपचार घेत आहेत. 20 हजार क्षमतेची दुसरी टाकी बांबोळीतीलच सुपर स्पेशालिटी इस्पितळात स्थापन करण्यात आली आहे. या टाकीतून ऑक्सिजन पुरवठा प्रारंभ होताक्षणीच गोमेकॉतील 350 रुग्णांना तेथे स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे गोमेकॉवरील ताण काही प्रमाणात कमी झाला. आता उद्यापासून खासगी इस्पितळे ताब्यात आल्यानंतर तो ताण आणखीही बऱयाच प्रमाणात कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोमेकॉतील रुग्णांना यापुढे क्रायोजनिक टाकीतूनच ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार असून आपत्कालीन स्थितीत ’स्टँड बाय’ म्हणून 24 तास ट्रॉलीही तयार ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. राज्यात बाधितांचे प्रमाण जे 51 टक्क्यांपर्यंत पोहोचले होते ते सध्या 35 टक्क्यांवर आले आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळेच हे यश मिळत असून भविष्यात तो आणखीही कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.