ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पक्षातर्फे श्वेतपत्रिका प्रसिद्ध करत केंद्र सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. केंद्रावर टीका करण्याचा हेतू नसून संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशाला मदत करण्यासाठी ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करीत असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, संपूर्ण देशाला तिसरी लाट येणार असल्याचे माहित आहे. सरकारने त्यासाठी तयार राहावे असा आमचा आग्रह आहे. तसेच श्वेतपत्रिकेचा हेतू सरकारडे बोट दाखवत टीका करण्याचा नसून देशाला संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात मदत करणे आहे, हा आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करताना नेमक्या काय चुका झाल्या याची संपूर्ण माहिती यामध्ये आहे. तिसरी लाट आल्यास नेमके काय करावे सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 90 टक्के लोकांचा जीव वाचवता आला असता. यामागचे सर्वात मोठे कारण ऑक्सिजनचा तुटवडा होय. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही पण ऑक्सिजन वाचवू शकतो.