ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोविड – 19 संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो असा इशारा W.H.O च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी दिला आहे. मात्र मला आशा आहे की एका प्रभावी लसीमुळे या व्हायरसचा नाश होऊ शकतो.
पुढे त्या म्हणाल्या, जगात आतापर्यंत या कोरोना व्हायरसच्या बाधितांची संख्या जवळपास 40 लाख आहे तर आतापर्यंत 3 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.
कोरोनाचा प्रभाव जिथे जास्त आहे तिथे तो व्हायरस परिपक्व होतो का हे आपल्याला पहावे लागेल. त्याचबरोबर या व्हायरसला रोखण्यासाठी लस विकसित करावी लागेल. याची लस बनवणे हा चांगला पर्याय असला तरी तिची सुरक्षा, तिचा प्रभाव, उत्पादन आणि समान वितरण यासारख्या ब-याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.
W.H.O. च्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल जे रेयान म्हणाले की कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरस सोबतच जगणे शिकावे लागेल. यासाठी त्यांनी H.I.V विषाणूचे उदाहरण देऊन सांगितले की ज्याप्रमाणे H.I.V विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच कोरोना व्हायरस कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही. H.I.V. चा विषाणू अजूनही नष्ट झालेला नाही ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दिर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. त्यामुळे आपल्याला वास्तवाचा स्विकार केला पाहिजे कोरोना व्हायरस कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही असे ही रायन यांनी यावेळी सांगितले.