सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची कोरोना महामारीच्या विषयावर वेगळी परिषद घ्यावी याचा अर्थ या साऱया प्रकरणातच राजकारण घुसले आहे असा आहे. त्यासाठी दोष कोणाला द्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेला येऊन एक वर्ष नुकतेच उलटले असताना आता दुसरी महाभयंकर लाट येऊ घातल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. देशातील केसेस दररोज दीड लाखापेक्षा जास्त वाढत आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी ही महामारी पसरली आहे. जम्मू आणि काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला त्याने ग्रस्त झाले आहेत तर केरळमधील मुख्यमंत्री पिनारायि विजयन तसेच त्यांचे काँग्रेसमधील प्रतिस्पर्धी ओमेन चंडीदेखील. दररोज शिस्तबद्ध जीवन जगणारे संघप्रमुख मोहनराव भागवतदेखील नागपूरमध्ये या महामारीचा मुकाबला करत आहेत. दुसरी लाट पहिल्यापेक्षा महाभयानक आहे अशी भाकिते व्यक्त होत आहेत. जेव्हा लसीचे दोन डोस दिले जातात तेव्हा एक प्रशस्तीपत्र मिळते की कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्याच्या लढाईत ही पाठीवरील थाप असते. या सर्टिफिकेटवर कोणा शास्त्रज्ञाचे चित्र नसते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असते. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या कोरोना विरुद्धच्या रणनीतीबाबतच प्रश्न विचारले गेले नसते तरच नवल होते. विरोधी पक्ष आणि गैरभाजप सरकारांनी केंद्राच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्हेच प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत. मुंबईसकट बऱयाच शहरात लसीचा भयानक तुडवडा जाणवत आहे. इस्पितळांनी तशा पाटय़ादेखील लावल्या आहेत. अशा परिस्थितीत ‘टीकाकरण महोत्सव’ (लस उत्सव) साजरा केला जात आहे. ‘अगोदर लस पुरवठा करा. उत्सव सोडून द्या’, असे विरोधकांचे पालुपद आहे.
हे मात्र खरे की सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या रणनीतीत बरेच विरोधाभास समोर येत आहेत. भारत जगातील सर्वात मोठा लस निर्माता आहे अशी पाठ थोपटली जात असताना त्याच्या गरजू लोकांना देण्याकरता लसच शिल्लक नाही. 18 वर्षावरील सर्वाना लस टोचावी असे काही वैद्यकीय संघटना ठासून सांगत असताना त्याकडे कानाडोळा केला जात आहे कारण देशामध्ये लस तुडवडा आहे असे आरोप होत आहेत ते फारसे गैरलागू वाटत नाहीत. जगात सर्वात महत्त्वाकांक्षी लसीकरण कार्यक्रम भारताने राबवला असे एकीकडे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ही गती फार धीमी आहे असे वाटत आहे. देशाच्या 130 कोटी लोक संख्येतील 10 कोटींनाच ही लस आतापर्यंत मिळालेली आहे. सध्याचीच गती कायम राहिली तर सर्व लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी अजून किमान एक वर्ष लागेल. मोदी सरकारने जगामध्ये वाहवा मिळवण्यासाठी लसीच्या मोठय़ा प्रमाणावर निर्यातीला मान्यता दिली म्हणूनच हा तुडवडा जाणवत आहे अशी ओरड ऐकू येत आहे ती सर्वस्वी गैरलागू नाही.
जोपर्यंत सर्वानाच लसीकरण होत नाही तोवर उद्योगधंदे आणि शिक्षणाचा गाडा सुरळीत होणार नाही आणि जीवनरहाटीचा गाडाच ठीक चालणार नाही हे सर्वजण जाणून आहेत. असे असताना भाजप आणि सरकारकडून विरोधी पक्षांवर हल्ले सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार काही चुका करत असेलही पण शेजारील गुजरातमध्ये सारे काही आलबेल नाही हे देखील सत्य आहे. महाराष्ट्रात या महामारीने कहर माजवला असला तर मोदी आणि अमित शहा यांच्या गृहराज्यात कोरोनाची साथ फार आटोक्मयात नाही. गुजरातमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील एक प्रभावी औषध मिळत नाही ते तेथील राज्य भाजपच्या प्रमुखाच्या घरी मिळते असे वेगळेच राजकारण सुरू आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची या महामारीच्या विषयावर वेगळी परिषद घ्यावी याचा अर्थ या साऱया प्रकरणातच राजकारण घुसले आहे असा आहे. त्यासाठी दोष कोणाला द्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.
सरकार आणि विरोधी पक्षात सुरू झालेला कलगीतुरा म्हणजे महामारीविरुद्धचे हे महायुद्ध एकदिलाने लढले जात नाही आहे याचे निदर्शक आहे. गैरभाजप राज्यांशी सापत्नभावाने केंद्र वागत असल्याने त्यांना या महामारीशी झुंज देण्यात अनेक अडचणी येत आहेत असे विरोधकांचे आरोप आहेत. पहिल्या टाळेबंदीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आणि उद्योगधंद्यांना आजारी केले. आता दुसरी लाट काय हाहाकार माजवणार या चिंतेने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पुढील आठवडय़ात देशाच्या काही शहरात टाळेबंदी परत येणार अशी भीती वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यातून प्रमुख शहरात येणारे मजूर परत आपली रोजीरोटी जाणार या भयात आहेत. यातच बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत सर्व सुरक्षा नियम सर्वच पक्षांनी धाब्यावर बसवल्याने या राज्यात पुढील काळात महामारी वाढू शकते. पहिल्या लाटेचे शिवधनुष्य आपण जोमाने पेलले असा दावा करणाऱया मोदी सरकारला दुसरी लाट परतवायचे दिवे लावून दाखवा नाहीतर तोंडघशी पडाल असे शालजोडीतील काही आपल्यांकडूनच मिळू लागले आहेत. आत्तापर्यंत सारे काही सुरळीत झाले असा डांगोरा पंतप्रधान पिटत असतील तर जर का आता परिस्थिती बिघडली तर त्याचे खापर त्यांच्यावरच फोडले जाईल असे सांगितले जात आहे. लस नसताना पहिल्या लाटेचा मुकाबला करणाऱया देशाला लस निर्माण होऊनही महामारीशी झुंजावे लागत आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील रात्रीची संचारबंदी सुरू झाली आहे आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, उत्तर प्रदेश अशा 7-8 राज्यांमध्ये महामारीचा कहर जास्त आहे.
सुनील गाताडे