ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीतही पोलीस आपल्या जिवाची पर्वा न करता ही लढाई लढत आहेत. मात्र या पोलिसांभोवतीच कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीला आता मंत्रालयातील दीड हजार अधिकारी व कर्मचारीही येणार आहेत. ते परप्रांतीयांना परत पाठवण्याच्या कामात पोलिसांना मदत करणार आहेत.
परप्रांतीयांना परत पाठवण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्येे 40 पेक्षा कमी वय असलेले अधिकारी व कर्मचारी यांना काम करावे लागणार आहे. रुजू न होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मंत्रालयातील हे कर्मचारी स्थलांतरित मजुरांची माहिती संकलित करणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 1300 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून, 12 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. तर 428 पोलीसांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.