ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आवश्यकता लक्षात घेऊनच लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल आपण जनतेची माफी मागतो. मात्र, ही आपल्या जीवन मरणाची लढाई असून, सर्वांनी लक्ष्मणरेषा पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, कोरोनाची लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई आहे. कोरोना विषाणूने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका, कोरोनापासून वाचण्यासाठी, ही लढाई जिंकण्यासाठी लक्ष्मणरेषा पाळा.
काही नागरिक लॉव डाऊन गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, असे करू नका. कारण कोरोना विषाणू मानव जातीच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे की लढाई जिंकायची असेल, तर डॉक्टर आणि सरकारच्या सूचनांचे पालन करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करीत ते म्हणाले, कोरोना बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. त्याचबरोबर पथ्य आणि योग्य उपचाराने कोरोनावर मात करता येऊ शकते, असे ते या वेळी म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी डॉक्टरांशी संवाद साधला. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱयांचे आभार मानत संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही दिली.