केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांचे प्रतिपादन- मंत्र्यांना विविध सूचना
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेने देशात हाहाकार निर्माण केला आहे. वाढत्या संसर्गाशी लढण्यासाठी केंद्र सरकार आपल्या पद्धतीने पूर्ण क्षमतेने लढत आहे. सरकारची सर्व शस्त्रे एकजूट होऊन वेगवानपणे काम करीत आहेत. देशासमोर ठेपलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीत केंद्र सरकार समर्थपणे सामोरे जात आहे. या लढय़ाला बळ देण्यासाठी सर्व मंत्र्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील संबंधितांशी सतत संपर्कात राहून मदत करावी, तसेच त्यांचा अभिप्रायही घ्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट देशभरात झपाटय़ाने पसरत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अनेक कोरोनाबाधितांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱया लाटेनंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवर समस्या ओळखून त्यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. याबरोबरच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 14 महिन्यांत देशातील जनतेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये कोरोना संसर्गाची सद्यस्थिती बिकट असून देशात एक मोठे संकट उभे राहिल्याचे मंत्रिमंडळाने मान्य केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारांना रुग्णालयात बेड वाढवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. ऑक्सिजनची सुविधा आणि उत्पादन व वाहतुकीतून आवश्यक औषधांची उपलब्धता याबद्दल केंद्राच्या मदतीबद्दल माहिती देण्यात आली. याव्यतिरिक्त, त्याचा पुरवठा आणि उपलब्धता वाढविण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.