आरोग्यमंत्र्यांकडून ‘अलर्ट’- देशात दोन नवे कोरोना स्ट्रेन दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या आठवडाभरात देशातील काही भागात कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असल्यामुळे कोरोनाविषयक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. तसेच लसीकरण सुरू असले तरी कोरोना संकट संपलेले नसल्यामुळे मास्क घालणे, सोशल डिस्टन्स राखणे आणि वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी हे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे अथवा साबण आणि शुद्ध पाणी यांचा वापर करून हात धुवून स्वच्छ करणे नागरिकांच्या हिताचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दुसरीकडे भारतात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील नवा कोरोना स्ट्रेन दाखल झाल्याचा संशय व्यक्त होत असून देशात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून आली. परंतु देशात काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नजिकच्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या चौघांना नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय ब्राझीलमधून आलेल्या एका व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेरिएंट हा नवा स्ट्रेन अमेरिकेसोबतच आणखी 41 देशांमध्ये पसरला आहे.
भारतात 4 जणांना दक्षिण आफ्रिकेच्या एसएआरएस-सीओव्ही-2 विषाणूची लागण झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहेत. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात ब्राझीलच्या एका व्यक्तीला संसर्ग झाल्यामुळे आता अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. भारतात परत आलेल्या चार जणांना दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूची लागण होण्याची पुष्टी झाली असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. संक्रमितांपैकी 2 जण दक्षिण आफ्रिकेतून परत आले असून प्रत्येकी 1 जण अंगोला आणि टांझानियाहून परतले आहेत. आता विदेशातून आलेल्या सर्वांना तपासणीसाठी क्वारंटाईन केले जात आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मुंबईत जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दिवसाला सरासरी 300 ते 350 रुग्ण वाढ होत होती. पण आता हा आकडा 650 पर्यंत पोहोचला आहे.
50 वर्षांवरील नागरिकांना मार्च महिन्यात लसीकरण
देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात झाली होती. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱयांना लसी देण्यात आल्या. आता मार्च महिन्यापासून 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून देशात लसीकरण सुरू असून भारताने आतापर्यंत इतर 20-25 देशांना लसी पोहोचवल्या आहेत. भारतात अजूनही 18-20 लसी प्रीक्लिनिकल, क्लिनिकल आणि ऍड्व्हान्स स्टेजमध्ये आहेत. पुढील महिन्यापर्यंत आणखी काही लसींना अनुमती मिळण्याची अपेक्षा आहे.
83 लाख लोकांना दिली लस
15 फेब्रुवारी 2021 ला सकाळी आठ वाजेपर्यंत 83 लाख आरोग्य कर्मचारी आणि प्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 82 लाख 85 हजार 295 लाभार्थींना 1 लाख 73 हजार 729 सत्रांमध्ये लस देण्यात आली. त्यात 59 लाख 88 हजार 113 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस), 24 हजार 561 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) आणि 22 लाख 72 हजार 621 प्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे.
दिवसभरात 11,610 नवे रुग्ण
गेल्या सात दिवसांत देशातील 188 जिल्हय़ांमधून कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आले नाही. मात्र, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या चोवीस तासात 11 हजार 610 नवे रुग्ण सापडल्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांचा आकडा 1 कोटी 9 लाख 37 हजार 320 वर पोहोचला आहे. तर, 11 हजार 833 जणांना दिवसभरात डिस्चार्ज मिळाल्यामुळे आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 44 हजार 858 रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार अखेरच्या चोवीस तासात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकंदर मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 913 झाला आहे. देशात अजूनही 1 लाख 36 हजार 549 इतके सक्रिय रुग्ण आहेत.