ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस भारत देशात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत चाललेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी काही सल्ले ही दिले.
ते म्हणाले, या संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. तसेच केंद्र सरकार सर्व राज्यांसोबत उभे असून, राज्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बरोबर झालेल्या या चर्चेमध्ये पंतप्रधानांनी सर्व राज्यांची स्थिती जाणून घेतली. तसेच जनतेकडून लॉक डाऊन च्या काळात सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशांचे कठोरपणे पालन करून घ्यावे अशी सूचनाही यावेळी केली.
पुढे पंतप्रधान म्हणाले की, देशातील विविध भागातून मजुरांचे होत असणारे पलायन कोणत्याही परिस्थितीत रोखले गेले पाहिजे. यासाठी सर्व राज्यांमध्ये शेल्टर होम व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी असे ही त्यांनी यावेळी सांगितले.