प्रतिनिधी / कुडचडे
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे सरकार जे निर्णय घेत आहे ते जनतेच्या हितासाठीच आहेत. त्यात जनतेने व्यत्यय आणू नये व लोकांमध्ये भय निर्माण करू नये, असे आवाहन वीजमंत्री व कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जागरूक असून याअगोदर निर्णय घेतल्याप्रमाणे जे कोणी कोरोनाबाधित सापडणार त्यांना सर्वांत आधी सरकारी इस्पितळात भरती करण्यात येईल. रुग्णांची संख्या वाढल्यास आधी सरकारी मैदाने वा क्रीडा संकुले आणि त्यानंतर सरकारी महाविद्यालये किंवा अन्य सरकारी आस्थापनांचा वापर करण्याचे ठरविले होते. त्याचप्रमाणे तयारी सुरू आहे, असे काब्राल यांनी सांगितले.
आज राज्यातील लोक आपले जे नातेवाईक बाहेरगावात वा परदेशात कामांसाठी गेलेले आहेत त्यांना परत आणण्याची विनंती करत आहेत. त्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचललेली आहेत व किती तरी गोमंतकीय घरी पोहोचले आहेत. तसेच अजूनही बाहेरून असे गोमंतकीय यायचे बाकी आहेत, याकडे काब्राल यांनी लक्ष वेधले.
सध्या वास्को येथील मांगोरहिल भागात कोरोनाचा फैलाव वाढत असून राज्यातील इतर भागांमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे हा विषय गंभीर होत चालला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची सोय करण्याच्या बाबतीत तसेच बाहेरून येणाऱया लोकांचे विलगीकरण करण्याच्या बाबतीत जागा कमी पडण्याचे संकेत मिळू लागल्यामुळे सरकार तयारीचा भाग म्हणून सदर जागांचे सर्वेक्षण करून ठेवत आहेत याची नोंद जनतेने घ्यावी. कारण हल्लीच शिरोडा येथेही लोकांनी कोविड निगा केंद्रात कोरोनाचे रुग्ण ठेवण्यास आक्षेप घेतला होता. पण हे अत्यंत चुकीचे असून जनतेने अशा अडचणी निर्माण करू नयेत, असे आवाहन काब्राल यांनी केले.
बाजार बंद ठेवणे हा पर्याय नव्हे
हल्लीच कुडचडे येथील बाजारकर मंडळाने आपली भेट घेऊन कुडचडे मार्केट बंद करावे की नये या विषयावर चर्चा केली. त्यावेळी बाजार बंद ठेवणे हा पर्याय नसून कोरोनासंबंधी सांगितलेल्या अटी पाळण्यावर भर दिला जावा, असा निर्णय घेण्यात आला. मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच विनाकारण विविध ठिकाणी फिरण्यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे, असे काब्राल यांनी सांगितले. तसेच विनाकारण मोबाईलद्वारे लोकांमध्ये भय निर्माण करणारे वायफळ संदेश पाठवू नयेत. त्यापलीकडे होत असेल, तर संशय असल्यास मित्रांना ताबडतोब चाचणी करून घेण्याची विनंती करावी. अन्यथा कोरोनाशी संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.