ऑनलाईन टीम / मुंबई :
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सद्य स्थितीत महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारत आहे. महाराष्ट्राने नेहमीच सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत. पण विरोधक असो किंवा केंद्रातील कोणी असो महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. जर देशातील कोरोना आटोक्यात आणायचा असेल, तर महाराष्ट्र पॅटर्न राबवला पाहिजे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन काम केले पाहिजे. ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधला पाहिजे. अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केले तरच देशातील स्थिती सुधारेल आणि कोरोना संकट आटोक्यात येईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
- उत्तर प्रदेशातील परिस्थिती गंभीर
उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे, गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागत आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. अक्षरशः हाहाकार माजला आहे, ते पाहता देश रामभरोसे चालला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली आहे.
- कोरोना स्थिती हाताळण्यावर भर देण्याची गरज
तसेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर खर्च करण्याऐवजी देशातील कोरोना स्थिती हाताळण्यावर भर द्यावा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. पुढे ते म्हणाले देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून चिंता व्यक्त केली आहे. प्रोजेक्ट थांबवून कोरोनासाठी वापरण्यात यावा असे सांगितले आहे.