केंद्र सरकारकडून घोषणा, अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी पॅकेज
मुंबई / वृत्तसंस्था
कोरोना ऐन भरात असताना केंद्र सरकारने लोकांना, विशेषतः गरीबांना आधार देण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे हा उद्रेक आटोक्यात आल्यानंतर अर्थव्यवस्था गतीमान करण्याची खरी आवश्यकता भासणार असून त्यासाठी दुसरे आर्थिक पॅकेज घोषित होईल, अशी माहिती व्यय सचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी दिली.
सरकारने कोटय़वधी गरीबांच्या खात्यात थेट पैसा जमा केला. तथापि, असे दिसून आले आहे की यापैकी 40 टक्के पैसा खर्च न करता तसाच खात्यात पडून आहे. यामुळे या प्रोत्साहनपर पॅकेजच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. पॅकेज देण्याचा कालावधी हा यामुळे महत्वाचा मुद्दा बनला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळे दुसरे पॅकेज लोक जेव्हा खर्च करू शकण्याच्या परिस्थितीत येतील तेव्हा देणे योग्य ठरणार आहे, असा विचार त्यांनी व्यक्त केला.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे लोक पैसा वाचवून ठेवण्याकडे कल दाखवित आहेत. एकदा हा उद्रेक कमी होऊन आटोक्यात आला की लोक पुन्हा पूर्वीप्रमाणे पैसा खर्च करण्याच्या मार्गाला लागण्याची शक्यता आहे. त्यावेळी त्याना आणखी एक प्रोत्साहनपर पॅकेज दिल्यास ते अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी आणि मागणी वाढविण्याठी अधिक लाभदायक ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
कसे असेल पॅकेज
दुसरे पॅकेज प्रामुख्याने मागणी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असेल. कदाचित काही महत्वाच्या वस्तूंवरील वस्तू-सेवा कर कमी केला जाईल, तसेच कंपन्यांना व लघु उद्योजकांना अधिक सवलती दिल्या जातील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.