गुढी पाडव्यानंतर कर्नाटकात नेतृत्व बदल होणार, हे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे भाकित खरे ठरणार की नेहमीप्रमाणे या संकटावर मात करीत येडियुराप्पा पुन्हा आपली खुंटी घट्ट करणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.
कर्नाटकात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाली आहे. ही लाट थोपविण्यासाठी तज्ञ समितीने सरकारला सातत्याने दिलेल्या सल्ल्यांकडे सध्या दुर्लक्षच केले जात आहे. चित्रपटगृहात केवळ 50 टक्के उपस्थिती रहावी याची काळजी घेण्याची सूचना तांत्रिक समितीने केली आहे. मार्च-एप्रिलमध्ये दुसरी लाट येणार याचा इशारा तीन महिन्यांपूर्वीच तज्ञ समितीने दिला होता. गर्दी टाळण्याबरोबरच जत्रा, यात्रा, गर्दीत होणारे धार्मिक आचरण यावर निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली होती. सध्या दहावी-बारावी वगळता इतर शाळा-कॉलेज किमान पंधरा दिवस बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने या सर्व शिफारशी अव्हेरल्या आहेत. यामागचा सरकारचा उद्देश वाईट नसला तरी गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे. दोन आठवडय़ांपूर्वी रोज दोन ते अडीच हजार रुग्ण आढळून येत होते. हा आकडा आता 4 हजार पार झाला आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व त्यांची पत्नी चन्नम्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः देवेगौडा यांनी ट्विटरवरून ही बातमी जाहीर केली होती. मात्र, आरटीपीसीआर तपासणीत देवेगौडा यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर चन्नम्मा पॉझिटिव्ह आहेत. या दोघा जणांवरही खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांच्या आरोग्याची चौकशी केली आहे. बुधवारी एका दिवसातील राज्यातील एकूण रुग्णसंख्या 4,225 वर पोहोचली आहे. 25 ऑक्टोबर 2020 नंतर प्रथमच इतक्मया मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रात्रीचा कर्फ्यु व लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कर्नाटकात लॉकडाऊनची वेळ यायची नसेल तर प्रत्येकाने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कारण, एप्रिलअखेरपर्यंत रोज 30 हजारहून अधिक रुग्ण आढळून येण्याचा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याचे भान प्रत्येकाला ठेवावे लागणार आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवडय़ात बैठक झाली. या बैठकीनंतर कर्नाटकात नियम अधिक कडक होणार, अशी अटकळ होती. मात्र, मास्क परिधान न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच काही नियमावली जाहीर करून सरकारने प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे जाहीर केले आहे. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पुन्हा नागरिकांना धोक्मयाचा इशारा दिला आहे. तरीही कर्नाटकातील सध्याची परिस्थिती पाहता लग्न, धार्मिक समारंभ, जत्रा, यात्रा मोठय़ा थाटात सुरू आहेत. यावरून कोरोनाची भीती कोणालाच राहिलेली नाही, हे लक्षात येते. लग्न व अंत्यविधीसाठी किती जण उपस्थित रहावेत, याची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तरी या मर्यादेचे कोणीच पालन करताना दिसत नाही. खास करून वृद्ध, दीर्घकालीन आजार असणाऱया व्यक्ती, गर्भवती महिला, दहा वर्षांखालील मुलांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग जरुरीचा आहे.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासंबंधीच्या सीडी प्रकरणाला शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आला आहे. या एका महिन्यात कर्नाटकात बऱयाच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी सीडीतील युवती राजधानीत अवतीर्ण झाली आहे. या युवतीने न्यायालयासमोर जबानी दिल्यानंतर रमेश जारकीहोळी यांची संकटे वाढली आहेत. दुसरीकडे या युवतीच्या पालकांनी तिची जबानी ग्राहय़ धरू नये, ती डी. के. शिवकुमार यांच्या दबावाखाली आहे. या दबावाखाली येऊन तिने दिलेली जबानी न्यायालयाने ग्राहय़ मानू नये, अशी मागणी करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिवसेंदिवस या प्रकरणाला कलाटणी मिळत चालली आहे. एखाद्या लोकप्रिय मालिकेच्या कथानकाला अनपेक्षित वळण मिळते, त्याच धर्तीवर या प्रकरणातील घडामोडी घडत आहेत. युवतीने दिलेली बलात्काराची फिर्याद व न्यायालयातील जबानीमुळे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना अटक होणार, अशी अटकळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकातील राजकीय वातावरणात अस्थिरतेकडे वाटचाल करीत आहे. पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या निवडणुकीत कोणालाच फारसा रस नाही. कर्नाटकातील जनता आणि राजकीय नेत्यांचेही लक्ष सीडी प्रकरणाकडेच असल्याचे जाणवते आहे.
ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच राज्यपालांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांविरुद्ध त्यांनी गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री आपल्या खात्यात अनावश्यक हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे आपल्याला काम करणे कठीण होत आहे, असे सांगत त्यांनी राज्यपालांना समन्वय साधण्याचा आग्रह केला आहे. आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध एखाद्या ज्ये÷ मंत्र्यांनी राज्यपालांकडे तक्रार करण्याचा कर्नाटकातील अलीकडच्या काळातील हा पहिलाच प्रकार आहे. ग्रामीण विकास खात्यासंबंधी मुख्यमंत्री स्वतःच निर्णय घेत आहेत. आपल्या निदर्शनास आणून न देता अनुदान वाटप केले जात आहे. याकडे ईश्वरप्पा यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे. कर्नाटकात येडियुराप्पा आणि ईश्वरप्पा या दोन नेत्यांमधील मैत्री आणि सत्तेसाठीचा संघर्ष हे सर्वश्रुत आहेत. हे दोन्ही नेते एकाच शिमोगा जिल्हय़ाचे. संघ परिवारातून राजकारणात आलेले. आता या दोन नेत्यांमध्ये मोठा सत्तासंघर्ष आहे. गेल्या काही महिन्यांपासून माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांविरुद्ध आघाडी उघडली होती. आता ईश्वरप्पा यांनीही बंडाचा पवित्रा घेतला आहे. याबरोबरच ‘ऑपरेशन कमळ’ संबंधी दाखल झालेल्या प्रकरणात येडियुराप्पा यांच्या चौकशीला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. गुढी पाडव्यानंतर कर्नाटकात नेतृत्व बदल होणार, हे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे भाकित खरे ठरणार की नेहमीप्रमाणे या संकटावर मात करीत येडियुराप्पा पुन्हा आपली खुंटी घट्ट करणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.